येणार्‍या २६ जानेवारी निमित्तने एक स्मरण ! INS कुकरी….

मित्रांनो,
हा लेख ९ डिसेंबरलाच लिहिला होता आणि त्या दिवशी टाकायचा विसरलो, तो आत्ता टाकत आहे..

बरोबर याच दिवशी १९७१ साली……

समुद्रात सभोवताल मृत्यूचे तांडव चालले होते. जहाज बुडताना पाण्यात ज्या मोठ्या लाटा व भोवरे उठतात त्यात माणसे गंटागळ्या खात होती. अनेक वस्तू पाण्यात भरकटत होत्या, बुडून वर येत होत्या. धूराचा दर्प जाणवत होता आणि अशातच त्या बुडणार्‍या जहाजाच्या सगळ्यात वर राहिलेल्या भागावर उभे असलेल्या कॅप्टन महेन्द्र नाथ मुल्ला यांनी आपल्या गळ्यातले लाईफ सेव्हिंग जॅकेट खाली पाण्यात एका खलाश्याकडे टाकले आणि एका हाताने तो लोखंडी कठडा घट्ट धरत त्यांनी ओठात त्यांची मोठी सिगार धरली मग इकडे तिकडे न बघता त्यांनी क्षितिजावर नजर रोखली………….ती शेवटचीच.
कॅप्टन महेन्द्रनाथ मुल्ला.

जहाज होते आय. एन. एस. कुकरी आणि कॅप्टन होते महेन्द्र नाथ मुल्ला. बोटीला जलसमाधी मिळाली आणि त्याबरोबर कॅप्टन मुल्लांनीही आपल्या जहाजाबरोबर जलसमाधी घेतली. ती सिगार ओढताना त्यांच्या मनात काय विचार आले असतील ? त्यांना असे वाटले असेल का की चला पाण्यात उडी मारूया ? असा विचार आलाही असणार पण त्या जहाजात खाली त्यांचे अनेक अधिकारी आणि खलाशी अडकले होते. ते, त्यांची कुटूंबे ही त्यांची जबाबदारी होती. त्यांना सोडून ते जाऊच शकत नव्हते. त्यापेक्षा नौदलाची परंपरा राखत त्यांनी मृत्यूलाच कवटाळले असे म्हणायला हरकत नाही. या परंपरेचे महत्व काय ? याच परंपरेमुळे राष्ट्रे उभी राहतात. अशा परंपरा निर्माण झालेल्या आपण इतिहासात बघतो आणि त्या राखायचा प्रयत्न करतो.
आधी लगीन कोंडाण्याचे…. ही परंपरा.
प्रतापराव गुजरांनी राखली ती परंपरा.
भगवा झेंडा जमिनीवर पडून द्यायचा नाही ही ही परंपरा.
महाराजांनी सुरत लुटली तेव्हा मुसलमान किल्लेदार पळून गेलेला असताना दोन ब्रिटीश अधिकर्‍यांनी १०० सैनिकांसह सुरतमधे फ्लॅगमार्च काढला हीही परंपराच.
आपल्या रेजिमेंटच्या झेंड्याला कमीपणा येईल असे कसलेही वर्तन करायचे नाही ही परंपरा. पराभवातही झेंडा परत घेऊन यायचा ही परंपरा.
फिल्ड आर्टिलरीमधे असलेल्या मराठ्यांच्या रेजिमेंटनी माघार घ्यायच्यावेळी तोफांच्या नळ्या खांद्यावर वाहून आणल्या ही परंपरा………..
या परंपरा पाळताना किती बांगड्या फुटल्या, किती मुले निराधार झाली याची गणतीच नाही. महत्वाच्या असतात या परंपरा, कारण त्या आठवूनच तरूणांच्या हातून भव्य दिव्य पराक्रम होतात आणि राष्ट्र बलवान होते. सर्वसामान्य व्यवहाराच्या पातळीच्या पलिकडे जाऊनच यांच्याबद्दल विचार करावा लागतो. शनीच्या दगडावर तेल थापण्याच्या परंपरेपेक्षा या परंपरा मित्रहो फार थोर आहेत.

कॅप्टन मुल्लांनीही अशीच परंपरा पाळली आणि आपली जीवनयात्रा संपविली ती हकीकत आपण आज वाचणार आहोत. कॅ. मुल्लांसारखा एकच माणूसही देशाची शान वाढवतो.

पाकिस्तानने भारतीय हवाईदलाच्या मुख्य ठिकाणांवर हल्ला चढवला आणि युद्धाला तोंड फुटले. ३ डिसेंबरला भारतीय नौदलाने कच्छच्या समुद्रामधे पाकिस्तानी पाणबुडीचे संदेश पकडायचे प्रयत्न चालवले होते. त्यात यश येऊन ७/८ तारखेला दक्षिण-पश्चिम या दिशांमधे दीवच्या आसपास पाकिस्तानची पाणबुडी असेल असा निष्कर्श काढण्यात आला. दीव हे आपल्या नौकांचे प्रमूख बंदर होते आणि कराचीवर हल्ला करण्यासाठी येथे नौका जमणार होत्या आणि त्यातील काही आल्याही होत्या. या विभागात शत्रूची एखादी पाणबुडी शिरणे हे फारच धोकादायक ठरले असते. यासाठी या ठिकाणी पाणबुडीविरोधी नौका तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो किती योग्य होता हे लवकरच कळणार होते एडमिरल कोहिली त्या वेळी वेस्टर्न नॅव्हल कमांडचे मुख्य होते, त्यांनी २ डिसेंबरला मुंबईहून दीवला १४ वी फ्रिगेट स्क्वाड्रन रवाना करण्याचा निर्णय घेतला. यात तीन नौका होत्या. एक होती कुकरी, दुसरी होती कृपाण आणि तिसरी होती कुठार.

आय.एन.एस कुकरी-

आय.एन.एस. कृपाण -

पाकिस्तानची पाणबुडी पी.एन.एस. हँगोर

या तीनही नौकांना शस्त्रांची नावे देण्यात आली होती आणि त्या शस्त्रांची किर्ती जगभर होती. दुर्दैवाने कुठारच्या बॉइलर रुममधे मोठ स्फोट झाल्यामुळे तिला ४ तारखेला कृपाणने परत ओढत मुंबईच्या बंदरात नेले. पाकिस्तानकडे त्या काळातील सगळ्यात आधुनिक पाणबुडी होती. फ्रान्सची आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत ही डॅफीन जातीची पाणबुडी खरे तर या तिनीही नौकांना भारी होती आणि त्याचे मुख्य कारण होते या नौकांच्या जुनाट व कमी पल्ल्याच्या सोनार यंत्रणा. या पाणबुडीचे नाव होते PNS Hangor.

या पाणबुडीची आणि आपल्या नौकांची गाठ पडायच्या अगोदर पाणबूड्या नौकांना त्या काळात कशा व का भारी ठरायच्या ते बघूया. आता अर्थातच नौकांमधेही बराच बदल झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे पाणबुडीविरोधी विमानेही हल्ली या बोटींवर तैनात असतात.

१९७१ सालातील भारतीय नौदल आणि आत्ताचे नौदल यात जमीनस्मानाचा फरक आहे. पाणबुडीविरोधी अस्त्रे आणि वापरायच्या युद्धनितींवरही जास्त विचार झालेला नव्हता. आपली पहिली पाणबुडी १९६८ साली रशियामधे तयार झाली. आश्चर्य म्हणजे पाकिस्तानकडे १९६० सालीच पाणबूड्या आल्या होत्या आणि त्याही डॅफीन जातीच्या अत्याधुनिक. या युद्धनौका घेण्याच्या बाबतीत पाकिस्तानी नौदलाचे खरोखरच कौतुक केले पाहिजे. या अत्याधुनिक पाणबुडीला थांबवणार होत्या आपल्या या दोन जुनाट नौका.

कुकरीवर जी सोनार यंत्रणा होती तिचे नाव होते सोनार १७० आणि ही यंत्रणा आपल्याकडे असलेल्या सोनार यंत्रणांपैकी सगळ्यात उत्तम होती. अर्थात तिला सुधारणण्याचे कामही चालू होते. आणि त्याच उपक्रमात कुकरीवर एक यंत्रणा बसविली होती ज्यामुळे तिचा वेग बराच कमी झाला होता. या सोनार यंत्रणेचा पल्ला होता फक्त १५०० यार्ड आणि तो सुद्धा प्रयोगशाळेत. खोल समुद्रात असणार्‍या निसर्गनियमांचा आपला अभ्यास फारच कमी होता. भारताचे समूद्रकिनारे दुपार पर्यंत तापतात आणि वरच्या पाण्याचे तापमान आजुबाजुच्या वातावरणा इतके होते. त्यामुळे सोनार यंत्रणेमधून निघणार्‍या लहरी खरोखर खालच्या बाजूला वाकतात ज्यामुळे सोनार यंत्रणेचा पल्ला अजूनच कमी होतो. खोल समुद्राच्या पाण्याचे तापमान बर्फाच्या जवळपास असते. आता ज्या ठिकाणी हे दोन वेगवेगळ्या तापमानाचे पाण्याचे थर एकामेकांना भेटतात त्या तेथे फार मजेशीर प्रकार घडतो. या थराला म्हणतात “लेयर”. याची खोली साधारणत: असते ३० ते ६० मिटर. या थराला आपटून सोनारच्या लहरी परावर्तीत होतात. हा जो शास्त्रीय चमत्कार होतो त्याचा फायदा पाणबुडीचे कप्तान न उठवतील तर नवलच ! या थराच्या खाली पाणबूड्या चक्क लपतात आणि अत्यंत कमी वेगाने प्रवास करतात. आता या पाणबुडीला शोधणे किती अवघड असेल बघा. या उलट पाणबुडीला जहाज सहज ओळखता येते ते त्याच्या इंजिनच्या आवाजाने. पाणबुडीचे इंजीन हे तुलनेने बरेच शांत असते. त्यांना या शांततेचा भंग फक्त जेव्हा ते टारपेडो सोडतात तेव्हाच करावा लागतो.

याचा अर्थ आपल्या लक्षात येतो आहे का ? कॅप्टन मुल्लांना हे माहीत होते की आपण पाणबुडीचा वेध घेण्या अगोदरच तिने आपला वेध घेतलेला असणार आणि समजा त्यांनी पाणबुडीचा वेध घेतला तरीही त्या अगोदरच त्या पाणबुडीने टॉरपेडो सोडला असणार. यामुळे स्वत:च्या बचावासाठी काहीच मिनिटे उपलब्ध असणार, प्रतिहल्ला तर दूरच राहिला. कुकरीमधे नुसते लढणारे सैनिक नव्हते तर इंजिनियर आणि इतर टेक्निकल माणसेही होती. या माणसांचे धैर्य तर अचाटच असते. कारण यांना जहाजाच्या सगळ्यात खालच्या भागात काम करावे लागते. जेव्हा यांची नौका पाणबूड्यांविरूद्ध लढाईत उतरते तेव्हा हे जीवावर उदार होऊन आपल्या कॅप्टनला नौका हालचाली करायला नेहमीच उपलब्द्ध करून देतात. कुकरीमधेही या माणसांना माहीत होते की ते आता मरणार आहेत, पण शेवटपर्यंत त्यांनी जागा सोडली नाही हेही खरेच आहे. या माणसांना सोडून कुठलाही कॅप्टन जिवंत रहायची कल्पनाच करू शकत नाही. (तसे केले तर त्याला उरलेले आयुष्य झोपेविना काढावे लागेल). मित्रांनो जे आपले सहकारी आपली नौका चालवतात त्यांना मृत्यूच्या खाईत सोडून कुठलाही कप्तान जात नाही या परंपरेमागे हे एक सबळ कारण असावे. असो. कॅ. मुल्लांनी ही परंपरा पाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. नौदलातील प्रत्येक अधिकारी यापुढे जिवाच्या भीतीने कसलेही भ्याड कृत्य करताना या त्यागाची आठवण करेल आणि ते तो करणार नाही याची मला खात्री आहे.

वर ज्या अॅडमिरलचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या शब्दात पुढची कहाणी……………
“पाकिस्तानी नौदल आपल्या नौदलापेक्षा कशात सरस असेल तर ते त्यांच्या पाणबुडीदलामुळे. फ्रान्सकडून घतलेल्या या डॅफीन जातीच्या या पाणबूड्या अत्याधुनिक असून आपल्या पाणबुडीहुन सरस होत्या. कुकरीने हॅंगॉरला हेरण्या अगोदरच तिने कुकरीला हेरले होते. सोनारमुळे आणि विमानांच्या टेहळणीमुळे अशी एखादी पाणबुडी तेथे आहे याची कल्पना होतीच. १४ व्या पाणबुडीविरोधी स्क्वाड्रनला ही पाणबुडी हुडकून काढून, तिचा पाठलाग करून तिचा नाश करायला सांगितले गेले. याच दरम्यान हॅंगॉरच्या सोनारमुळे कुकरीचा ठावठिकाणा लागल्यामुळे तिच्यावर ३ टारपॅडो डागण्यात आले आणि काहीच मिनिटात कुकरी रसतळास गेली. कुकरीबरोबर गेले १८ आधिकारी आणि १७६ सैनिक/खलाशी आणि कमांडर कॅप्टन मुल्ला.

याच वेळी त्या नौकेवर असणार्‍या कमांडर मनू शर्मांनी काय लिहून ठेवले आहे ते बघू.
“मला आठवतय आमच्या जहाजाला टॉरपेडो लागले तेव्हा आमचे जहाज बुडू लागले. सूटायच्या मार्गात एक छोटे वर उघडणारे दार होते. या दरवाजातून जमेल तेवढ्यांना बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न चालू होते. प्रसंग असाच होता की माझ्या डोळ्यात पाणी तराळले. कॅप्टन मुल्लांनी मला आणि ले. कुंदन माल यांना त्या जहाजातून बाहेर ढकलले आणि स्वत:ला वाचवायला सांगितले. आम्ही जेव्हा पाण्यात पोहायला सुरवात केली तेव्हा ले. कुंदन कुठे गायब झाला ते कळालेच नाही. त्याला शोधताना माझी दृष्टी वर गेली तेव्हा मला कॅप्ट्न मुल्ला त्या कठड्याला धरून शांतपणे यांचा आवडता सिगार ओढत असताना दिसले. काही शेवटचीच मिनिटे शिल्लक होती. मला उमगले ते तेथे का उभे होते ते. ते त्यांचे जहाज सोडणार नव्हते”.

इकडे कृपाण जी कुकरी बरोबर या पाणबुडीच्या पाठलगावर होती, तिने हे सगळे बघितले आणि ती त्या पाणबुडीवर तुटून पडली. तिने इतके तोफगोळे डागले की त्या तोफा तापून बंद पडल्या. आता तिला दोन पर्याय होते. एक कुकरीच्या खलाशांना वाचवणे किंवा बचावकार्यासाठी लहान नौका समुद्रात सोडणे. या दोन्ही पर्यायासाठी कृपाणला थांबावे लागणार होते आणि त्यात प्रचंड धोका होता. नियमाप्रमाणे ती बुडणार्‍या नौके पासून काही अंतरावर गेली आणि परत काही तासांनतर या जागेवर आली. अर्थात यात एक तोटा झाला की त्या पाणबुडीला निसटून जायला वाव मिळाला.

कॅ. मुल्ला यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले.
या सर्व शूरांचे एक दीवला स्मारकही बांधण्यात आले.
स्मारक-

आपणही त्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहून आपला या परंपरेप्रती आदर व्यक्त करुयात.
जयंत कुलकर्णी.

या घटनेबद्दल नंतर अनेक उलटसुलट वादग्रस्त चर्चा झाल्या. कृपाणच्या कॅप्टनवर अनेक आरोप झाले. पण जे ड्रिलमधे शिकवतात/ठरवले जाते त्याप्रमाणेच तो कॅप्टन वागला हेही तितकेच खरे आहे.

Posted in इतिहास | १ प्रतिक्रिया

स्वर्गमंडप….खिद्रापूर

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदीर

बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्‍या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली. सकाळी ६ वाजता निघायचे होते कारण सकाळच्या कोवळ्या उन्हात फोटो काढायची संधी सोडायची नव्हती.

सकाळी उजाडता उजाडता खिद्रापूरला पोहोचलो. अरेच्चा देऊळ कोठेच दिसेना. ना कळस ना मोकळी जागा. पण दोन घराच्या मधे एक दरवाजा दिसला आणि वर गजराजांच्या मूर्ती स्वागताला हजर होत्या.
गजराज :

आत नजर टाकली आणि डोळ्यावर विश्वास बसेना.
बाहेरून दिसले देवळाचे काही भाग…

चला, मनात म्हटले ट्रीप वाया निश्चितच जाणार नाही. खिद्रापूरचे देऊळ आहे शंकराचे आणि त्याच्या अनेक नावापैकी एक घेऊन तो या देवळात आहे. “कोपेश्वर” अर्थात नेहमीप्रमाणे याच्या मागे ही दंतकथा आहेच. शिवमंदीरात आपल्याला अगोदर दिसतो तो नंदी. काळयाकुळकुळीत पाषाणातील सुबक मूर्तीला नमस्कार करूनच आपण शिवाच्या दर्शनाला जातो. पण येथे बघतो तर नंदी गायब. त्याचेही उत्तर खालील दंतकथेत दडले आहे. प्रजापतीला १६ मुली होत्या. त्यातील सर्वात धाकटी होती सती. शंकराच्या नादी लागू नको हा सगळ्यांचा सल्ला धुडकावून तिने शंकराला वरले. प्रजापतीला हे बिलकुल पसंत नव्हते. त्याने वाजपेय यज्ञ करायचा ठरवले व जाणूनबुजून आपल्या जावयला आमंत्रण दिले नाही. कटकट नको म्हणून स्वत:च्या कन्येलाही बोलावले नाही. शंकराला बोलाविणे नसल्यामुळे त्याचा तेथे जायचा प्रश्नच उरला नाही पण सतीला माहेरची आठवण येऊन तिने त्या यज्ञाला जायचा हट्ट धरला. शंकराने त्या स्त्रीहट्टाला शरण जावून तिला परवानगी दिली पण जाताना बरोबर नंदीला दिले. म्हणून या शंकराच्या निवासस्थानी नंदी नाही. हे यज्ञाचे ठिकाण होते कृष्णा नदीच्या पलिकडे. माहेरी गेल्यावर सतीचा अपमान झाला व तिच्या पतीचीही येथेच्छ निंदा करण्यात आली. ती सहन न होऊन सतीने तेथेच त्या यज्ञात जीव दिला. हे वृत्त कळताच शंकराचा क्रोध अनावर झाला. त्याने विरभद्राला त्या यज्ञाचा विध्वंस करायचे आवाहन केले. त्या वेळेस त्याने आपल्या जटा रागाने जमिनीवर आदळल्या ज्याने पृथ्वी कंप पावली इ..इ.. म्हणून हा “कोपेश्वर”.

संकेश्वरचा शंखनाथ, रायबागचा बकनाथ व कोपेश्वराचे दर्शन एका दिवसात केले असता स्वर्गप्रवेश आरक्षित आहे.

खालचे चित्र आपण माझ्या एका संगीतविषयक लेखात बघितले आहे.
गाभारा आणि त्याच्या पुढे सभामंडप किंवा रंगमंडप अशी रचना भारतातील बहुतेक देवळाची आहे.
गाभारा व सभामंडप.

काहीच देवळात अजून एका मंडपाची रचन केलेली आढळते ती म्हणजे “स्वर्गमंडप”. उदा. गोंदेश्वरलाही (सिन्नर) स्वर्गमंडप आहे. पण कोपेश्वरचा स्वर्गमंडप हा भारतातील सगळ्या स्वर्गमंडपात उजवा मानला जातो.
स्वर्गमंडप एका बाजूने…

हा स्वर्गमंडप खाली चित्रात दाखवलेल्या अशा ४८ खांबांवर उभा आहे.

चारही दिशांना चार दरवाजे आहेत. स्वर्गमंडपात अनेक आश्चर्ये बघायला मिळतात. पहिले नजरेत भरते ते म्हणजे वर छताला असलेले १३ फूट व्यासाची एक खिडकी.
छतातील गवाक्ष :

त्याच्याच बरोबर खाली एक गोल बरोबर १३ फूट व्यासाची गोल शिळा आहे. या दोन्हीचा मध्य बरोबर जुळलेला आहे. ही जी खालची शिळा आहे त्याच्या बाजूने गोलाकार १२ खांब आहेत ज्यावर हे वरचे खिडकी असलेले छत पेलेलेले आहे. या बारा खांबांच्या मागे अजून १६ खांबांचे वर्तूळ आहे. या सगळ्या खांबांनी ते छत आणि त्या मंडपाचा काही भाग पेलला आहे.

याच्या मागे अजून ८ खांबांचे वर्तूळ आहे. यातील प्रत्येकी दोन खांब चार दरवाजांच्या तुळया पेलण्यासाठी उभे केले आहेत. थोडक्यात या ४८ खांबांवर हा स्वर्ग उभा आहे. आणि आपण जर या मधल्या शिळेवर झोपलो तर आपल्याला स्वर्गात असल्याचा भास होतो. ( अर्थात स्वर्ग मेल्याशिवाय दिसत नाही असे म्हणतात आणि आपल्याला कोण हो स्वर्गात घेणार ? पण स्वर्गात जे असते ते सुंदर, भव्य, दिव्य असते असे आपण मानतो त्यानुसार ……आणि रंभा, उर्चशीही या देवळात आहेतच.)
स्वर्गमंडपातील खांब :

कुठल्याही देवळाचे (प्राचीन) काही भाग पडतात ते खालील प्रमाणे –
सगळ्यात खालची शिळा ज्यावर मंदीर उभे असते ती खुरशिळा. (जसे जनावरांचे खूर तसे) त्यावर जे जोते असते त्यावर बहुतेक वेळा हत्तींची शिल्पे असतात. हे हत्ती या मंदिराचे वजन झेलतात अशी कल्पना. त्या जोत्याला म्हणतात गजपट्ट. त्यावर मग मंदिराच्या भिंती उभ्या केल्या जातात. यावर नर नारी, देव देवता, प्राणी पक्षी, कहाण्या, कोरल्या जातात किंवा मूर्ती स्वरूपात गुंतवल्या असतात. या पट्ट्याला म्हणतात नरपट्ट. म्हणजे माणसांची जागा. या नरपट्ट्य़ामधे तीन बाजूला गाभार्‍यात उघडणारी गवाक्षे असतात त्याला म्हणतात देवकोष्ट. म्हणजे समजा एका बाजूचा विचार केला तर अशी रचना असते.
कुंड – त्यावर गोमुख किंवा मकरमुख
त्याच्याच पातळीवर खुरशिळा.
मग वजन पेलणारे गजपट्ट.
गजपट्ट :

त्या नंतर नरपट्ट. याच नरपट्ट्यामधे तीन बाजूला देवकोष्ट. चौथ्या बाजूला आत शिरायचे द्वार असल्यामुळे तेथे हे नसते.
नरपट्ट्मधील नक्षीकाम :

गजपट्टाच्या पातळीवर गाभारा.
देवकोष्ट :

मग छत व शिखर (असल्यास).

कोपेश्वर मंदिराचा सभामंडपही विशाल असून त्यात ४२ खांब आहेत. वर म्हटल्याप्रमाणे यात नंदीची मूर्ती नाही. येथून अर्थातच आपण गाभार्‍यात प्रवेश करता. मला वाटते हा एकमेव गाभारा आहे जेथे शैव आणि वैष्णव या दोघांची श्रद्धास्थाने एकत्र आहेत. कोपेश्वर आणि विष्णूचे रुप धोपेश्वर. शिवाचे दर्शन घेण्या अगोदर विष्णूचे दर्शन घ्यावेच लागते.
गाभार्‍यातील पिंड व धोपेश्वर.

शिल्पकला :
शिल्पकले बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. पण मी काही शिल्पांची छायाचित्रे आपल्यासाठी टाकत आहे, त्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल.

प्रियकराला पत्र लिहिण्यात गुंग झालेली सुंदरी. अशी तीन शिल्पे आहेत. पत्राची सुरवात आणि शेवट असे दाखवले आहे. म्हटल चला या सुंदर स्त्रीच्या हस्ते आपले नाव लिहून घेऊयात :-)

एक शिल्प

शिल्पातील सगळ्यात सुंदर स्त्री….

आशा आहे आपल्याला हे आवडले असेल आणि आपण हा नितांत सुंदर शिल्पकलेचा ठेवा बघायला जाल.

अजूनही बरीच छायाचित्रे आहेत पण विस्तारभयाने येथे टाकली नाहीत. भारतीय मूर्तीशास्त्र आणि शिल्पकला याचीही बरीच माहिती या निमित्ताने गोळा केली आहे, (थोडाफार आभ्यासही केला आहे), ती परत केव्हातरी…….

पूर्व-पश्चिम लांबी : १५२ फूट
रूंदी : १०४ फूट.
याचा आराखडा ACAD वर काढायला दिला आहे. तो आल्यावर याच धाग्यात टाकेन !
पूर्ण देऊळ

जयंत कुलकर्णी.

Posted in प्रवर्ग नसलेले | 4 प्रतिक्रिया

त्रिशंकू

त्रिशंकू !

“जाऊ का नको, जाऊ का नको” असे मनाशी म्हणत मी अखेरीस डॉ. प्रणव यांच्या दवाखान्यात पोहोचलो. आता यांचे आडनाव काय आणि त्यांची कन्सल्टींग रूम कूठे आहे हे विचारू नका. कारण जास्त माहिती द्यायची नाही हे आम्हाला शिकवलेले असते. अर्थात यात विशेष काही नाही पण सवयीचा परिणाम. डॉ. प्रणव यांच्याकडे यायचे कारण म्हणजे आम्ही आता चांगले मित्र झालो होतो. आमची क्लबमधे झालेली पहिली भेट मला अजूनही चांगली आठवते. त्यानंतर आठवड्यातून एकदा तरी भेटल्याशिवाय आम्हाला चैन पडायची नाही. खरे तर आमच्या दोघांचेही व्यवसाय पूर्णपणे भिन्न. ते अहमदाबादमधील एक निष्णात मानसरोग तज्ञ तर मी इस्रोमधून नुकताच निवृत्त झालेला एक शास्त्रज्ञ. पण क्लबमधे कॉफीचा आनंद घेत असताना आम्ही भरपूर गप्पा मारतो. डॉ. प्रणव यांना सॅटेलाईट्मधे फारच रस बुवा. माझ्याशी गप्पा मारताना ते आता जवळजवळ अर्धे शास्त्रज्ञ झाले होते असे म्हणायला हरकत नाही. मुळचा फार बुद्धीमान गृहस्थ. तर अशा माणसाच्या दवाखान्याची पायरी मला माझ्यासाठी चढावी लागेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पण जेव्हा माझ्या स्वप्नांनी मला हिसका दाखवला तेव्हा मला डॉ. प्रणव यांच्याखेरीज कोणाचे नाव आठवणार ? माझी स्वप्ने त्यांनाच समजू शकणार होती कारण ती जरा विज्ञानविषयक होती.
मी त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि त्यांच्या चेहर्याठवर त्यांचे नेहमीचे आश्वासक हसू उमटले.
“अरे व्वा, कोठारीसाहेब आज इकडे कोणीकडे ?”
“डॉ. मला सध्या विचित्र स्वप्ने पडताएत. नुसती स्वप्ने असती तर ठीक होते. पण………….”
“काळजी करू नका. रिलॅक्स ! आणि मला सगळे विनासंकोच, सविस्तर सांगा”.
“गेले काही रात्री मला दररोज एकच स्वप्नं पडतय”
“आहो त्यात काही विशेष नाही. नैसर्गिकच आहे ते” त्यांची अहोला आहो म्हणायची लकब मला नेहमीच मजेशीर वाटते.
“ऐका तर ! माझ्या स्वप्नात मी एक पृथीभोवती फिरणारा सॅटेलाईत असतो. सगळ्या लंबवर्तूळाकार कक्षेतून फिरताना मला पृथ्वीचे तेच तेच भाग परत परत दिसतात. डाव्याबाजूला डोळ्यात खुपणारा सूर्य तर उजव्या बाजूला एक अनामिक रंगाचे अवकाश, आणि त्यात चमकणारे तेजस्वी तारे. असे दृष्य़ कुठल्याही त्रिमीती सॅटेलाईट्ला दिसेल तसेच मलाही दिसते.”
“तुमचे आयुष्यच सॅटेलाईटवर काम करण्यात गेले आहे तर हेही स्वाभाविकच म्हणायला पाहिजे नाही का ?”
“डॉ. मलाही पहिल्यांदा असेच वाटले होते, आणि मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता नाही. परवा रात्री पडलेल्या स्वप्नात दररोज पडणार्याा स्वप्नात एक बदल झाला. त्या सॅटेलाईटचा संदेशवहनाचा ट्रान्सपॉंडर बंद पडला”
“असे दोन भारतीय सॅटेलाईटच्या बाबतीत घडले होते ना ? तुम्हीच सांगितले होते मला एकदा.”
“हो ! बरोबर ! पण या स्वप्नानंतर मला माझ्य़ा वास्तव जीवनात परस्परसंबंधात अडचणी येऊ लागल्यात, त्याचे काय ? परवाच माझा एक मित्र मला म्हणाला देखील ’काय रे आजकाल तू पुर्वीसारखा मोकळेपणाने बोलत नाहीस ?’ मला तर वाटते की माझी स्वप्ने मला कशापासूनतरी सावध करताएत. कशापासून हे मला शोधून काढायचे आहे !”
“हंऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ! डॉक्टरांनी एक मोठा सुस्कारा सोडला.
“कोठारीसाहेब या वयात बर्या च जणांना घरातील माणसांशी संवाद साधण्यास अडचण येते खरी. कदाचित ते कौशल्य तुमच्याकडे पहिल्यापासूनही नसेल, कामाच्या व्यापात तुमच्या व घरच्यांच्या किंवा शेजार्यां च्या लक्षात ते आले नसेल, अशीही शक्यता आहे. आणि एक लक्षात घ्या, तुमच्याशी ते आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणार तरी कुठल्या विषयावर ? सॅटेलाईट आणि त्यात वापरल्या जाणा्र्‍या अतिउच्च तंत्रज्ञानावर ? त्यांना काय समजणार या विचाराने तुम्ही त्यांच्याशी बोलला नसणार आणि त्यांनाही ते खरेच कळत नसणार मग संवाद होणार कसा ? त्यांना फक्त एकच माहीत असणार की हा माणूस काहीतरी भारी काम करतो” असे म्हणून ते हसले.
“मला वाटते आता निवृत्तीनंतर तुम्हाला वेळ आहे आणि तो राहिलेला संवाद साधायचा आहे. पण ज्यांच्याशी तो साधायचा आहे, ते एकदम कसे बदलणार ? त्यांना थोडा वेळ द्या. तो पर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांची मजा घ्या. हे सगळे स्वाभाविक आहे.”

माझा उदास चेहरा आणि पडलेला आवाज बघून बहुतेक त्यांना माझी दया आली असावी.

“ठीक आहे, काळजी करू नका. मी तुम्हाला काही औषधे लिहून देतो. पण अगोदरच सांगतो की ही औषधे म्हणजे साधी टॉनिक्स आहेत. तुमच्या समाधानासाठी दिलेली आहेत. मला खात्री आहे थोड्याच दिवसात तुम्हाला बरे वाटायला लागेल. आणि त्या स्वप्नांवर जास्त विचार करू नका. तो सॅटेलाईट काही इतक्या लवकर पडत नाही…… “ असे म्हणून डॉक्टर हसायला लागले.
“एका महिन्यानंतर परत भेटा. अर्थात क्लबमधे भेटूच पण तेथे हा विषय नको” डॉक्टरांनी मला जवळ जवळ जायलाच सांगितले म्हणाना ! मी ही त्यांचे आभार मानून बाहेर पडलो.

त्या नंतर पुण्याला गेलो. म्हटले जागा बदलून काही होतंय का ते बघूया. पण नाही. महिन्यानंतर मी जेव्हा परत डॉ.प्रणव यांच्या केबीनमधे प्रवेश केला तेव्हा मला पाहून त्यांनी एखादे भूत पाहिल्यासारखा चेहरा केला. खुर्चीतून ताडकन उठून ते म्हणाले
“ अरे ! काय अवस्था करून घेतली आहे तुम्ही स्वत:ची ? तुम्ही कित्येक दिवसात दाढीही केलेली दिसत नाही आणि हे असली कपडे ? तब्येत खालावलेली दिसतेय तुमची. माफ करा, पण अगोदर बसा तरी.”
त्यांनी माझ्या हातात पाण्याचा ग्लास दिला आणि ते माझ्या बोलण्याची वाट पाहू लागले.
“मला वाटते माझा खेळ संपत आला आहे. !”
“अरेच्चा ! शांत व्हा आणि सांगा बरं जरा मला काय झाले ते ?”
मी एक खोल श्वास घेतला आणि माझी कर्मकहाणी सांगायला सुरवात केली.
“मी तुम्ही दिलेली औषधे घेतली पण ती स्वप्ने काही थांबली नाहीत. मग बायकोच्या सांगण्यावरून काही देवधर्मही करून बघितला. पण दिवसेंदिवस ती स्वप्ने वाईटच होत चालली आहेत. त्या कम्युनिकेशन ट्रान्स्पाँडरचे सांगितले ना मी तुम्हाला मागे ? आता वीज निर्माण करणार्या त्याच्या दोन सोलर पॅनेलपैकी एक बंद पडला आहे. यामुळे आम्ही सगळ्यात घाबरतो अशा घटनांची साखळीच चालू झाली आहे आता. जोपर्यंत हा उरलेला पॅनेल काम करतोय तो पर्यंत तशी काळजी नाही म्हणा. आम्ही त्याचा अगोदरच विचार केलेला असतो. पण सूर्य ग्रहणाच्या वेळी मात्र वीजपुरवठा बॅटरीवर गेला आणि मला धक्काच बसला. एकच पॅनेल काम करत असल्यामुळे बॅटरी चार्जच झाली नव्हती. आता एक एक करत सगळ्या यंत्रणा बंद पडायला लागल्या आहेत. काही दिवसापूर्वी तापमान यंत्रणा बंद पडली आणि इकडे मला एकदम थंडी तर दुसर्याे क्षणी उकडायला लागले. थंडी वाजते म्हणून मी पांघरूण ओढले तर मला घामाच्या धारा लागल्या होत्या आणि मी दचकून जागा झालो. त्यानंतर मेमरी बॅंक बंद पडली आणि इकडे मला विस्मरणाचा त्रास चालू झाला आहे. तुमच्याकडे यायला निघालो आणि मला तुमचे नावच आठवेना. शेवटी प्रिस्क्रिप्शन शोधले तेव्हा ते कळाले. तिकडे सॅटेलाईटची कक्षा ठरवणारी यंत्रणा बंद पडली आणि डॉक्टर खरंच सांगतो गेले काही दिवस मी माझाच माझ्यावर ताबा नसल्याप्रमाणे उगचच भटकतोय. मला आता माझ्या हातापायातील शक्ती गेल्या सारखे वाटते आहे. माझे वजन तर तुम्ही बघितलेच !” एवढे बोलून मी धापा टाकायला लागलो.
“अशा सॅटेलाईटचा काय उपयोग ? तो तसाच त्रिशंकू सारखा अवकाशात लटकून रहातो. अशा सॅटेलाईटचे काय करतात हे मला चांगले माहीत आहे डॉक्टर !. त्याचा अकाली मॄत्यू करतात…….. जे वाचलेले इंधन आहे त्याने त्याची मोटर चालू करतात आणि त्याला सगळ्यात शेवटच्या कक्षेत ढकलतात. एकदा का तो या परवलयीन कक्षेत गेला की खेळ खलास तो परत येत नाही. आम्ही त्याला गमतीने भडाग्नीची कक्षा म्हणतो.
“आणि जर त्यात पुरेसे इंधन नसेल तर ?” डॉक्टरांनी विचारले.
“तर काय, मग तो भरकटतो आणि शेवटी पृथ्वीच्या कक्षेत ओढला जाऊन जळून नष्ट होतो. डॉक्टर मी आता भरकटतो आहे. पूढे काय होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मला माझी स्वप्ने हेच सांगत आहेत. मी मूर्ख, मला समजलेच नाही” पुढच्या कल्पनेनेच माझ्या घशाला कोरड पडली. ग्लासातले उरलेले पाणी मी घटाघटा पिऊन टाकले आणि डोळे मिटले. माझ्या कपाळावर जमा झालेले घामाच्या थेंबांचा स्पर्श मला आता जाणवू लागला होता आणि पाठीवरून वाहणारे घामाचे ओघळही.

समोरून काही प्रतिक्रिया आली नाही तेव्हा मी डोळे उघडले. डॉक्टर माझ्याकडेच रोखून बघत होते. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला.
“हे बघा कोठारीसाहेब, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले की हा तुमच्या मनाचा खेळ आहे. त्या स्वप्नांचा आणि तुमच्या वास्तव जीवनाचा काहीही संबंध नाही. आम्ही त्याला भास म्हणतो. इंग्रजीमधे हॅल्युसिनेशन्स. निवृत्तीने तुम्हाला जरा हळवे केले आहे. सगळ्यांना आयुष्यात यातून जावेच लागते. तुम्हाला आता जगाला आपली गरज नाही असे वाटते आहे, तेही स्वाभाविक आहे. तुमच्या ज्ञानाचा आता इस्रोला काही उपयोग नाही, आत्तापर्यंत जे काही मिळवले ते सगळे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटत असणार. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला पडणारी स्वप्ने ही या विचारांच्या प्रक्रियांची परिणीती आहे. थोडक्यात तुम्ही सध्या डिप्रेशनमधे आहात. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. मी काही यावरच्या गोळ्या लिहून देतो. १० दिवस त्या घ्या आणि निवांत रहा ! तुमच्या अवकाशासंबंधी कसलाही विचार करू नका. विसरून जा की तुम्ही एक वैज्ञानिक आहात ”

डॉ. प्रणवांचा जर माझ्या स्वप्नांवर विश्वास बसत नसेल तर अजून कोणाकडे जायचा प्रश्नच नव्हता. बायकोला तर हे सगळे सांगण्यात काही अर्थच नाही. मी गुपचूप त्यांनी दिलेल्या गोळ्या विकत घेतल्या आणि घरी आलो.

त्या गोळ्यांनी मात्र कमाल केली.
बघा ना ! मागच्याच आठवडयात माझा मुलाने मला हाक मारली “ बाबा लवकर या ! टीव्हीवर जी एस एल व्ही चे प्रक्षेपण दाखवताएत. या लवकर तुम्हाला बघायचे असेल तर !’
“नको रे बाबा ! त्यांना त्यांचे काम करू देत. हुशार मंडळी आहेत ती. मी आता ’चलती का नाम गाडी बघतोय’ !”

मूळ लेखक : इंग्रजीमधे श्री दिलीप सुभेदार
भाषांतर : जयंत कुलकर्णी.

Posted in कथा | १ प्रतिक्रिया

हिंद्दुस्थानी संगीत व मिया तानसेन भाग ३

संगीत सम्राट तानसेन यांचे समाधीस्थळ.

संगीत रत्नाकरमधे सांगितलेल्या कथेवर तानसेन आणि त्यांच्या घराण्याचा विश्वास होता. सारंगदेवाने म्हटले आहे की मार्ग संगीत हे खुद्द ब्रह्मानेच जन्माला घातले आहे आणि ते सामवेदातून लोकापुढे आले. यालाच सामवेदामधे नादविद्या म्हटले आहे. नाद हा ब्रह्माचाच एक अवतार आहे असे मानत. म्हणूनच नादाला नादब्रह्म असेही संबोधत. शंकराकडून या विद्येचे प्रथम ग्रहण पार्वती आणि सरस्वती यांनी केले आणि मग सुरु झाली एक परंपरा. यानंतर ही विद्या ग्रहण केली त्या त्या काळात गणपती, नारद आणि मारूती यांनी. गंधर्व, किन्नर इ. जमातींनी ही विद्या नारदांकडून ग्रहण केली.

नारदाच्या संगीत शिक्षणाची एक मजेशीर हकिकत अदभुत रामायणामधे दिली आहे.
शंकराकडून संगीतविद्या ग्रहण केल्यावर नारदाला त्याच्या ज्ञानाचा अतोनात गर्व झाला होता. त्याच्या ते लक्षात आणून देण्यासाठी श्रीविष्णूने नारद ऋषींना स्वर्गात नेले. तेथे एका विशाल महालात पाऊल टाकताच जे दृष्य नारदमुनींना दिसले त्याने त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. तेथे अनेक स्त्री पुरूष वेदनेने विव्हळत पडले होते. काहींचे पाय तुटले होते तर काहींचे हात. आपण चुकून नरकात तर आलो नाही ना असे नारदाला वाटले. या सगळ्यांची ही अवस्था कशी काय झाली ? कोण आहेत हे ? असे नारदाने श्रीविष्णूला विचारले. त्यावर श्रीविष्णूंनी जे उत्तर दिले की हे सगळे राग आणि रागिणी आहेत. पृथ्वीतलावर नारद नावाचा एक गायक त्यांच्या जीवाशी खेळला त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. खुद्द शिवशंकरजीच येऊन, त्यांनी रागांची आळवणी केली तरच ते पूर्वपदावर येतील.

तानसेनाने या संगीताचे जे शिक्षण दिले त्यात पौराणिक गोष्टींचा बराच वापर केलेला आढळतो. त्याच शिक्षणात संगीत तज्ञ भरतऋषी, मातंग, सारंगदेव आणि कालिनाथ यांचाही उल्लेख केलेला आढळतो. मला याच्यातील फक्त सारंगदेव हेच माहीत आहे आणि तेसुद्धा संगीत रत्नाकरामुळे. तसेच हनुमानाची कथा यात नंतर घुसडलेली दिसते कारण तसा उल्लेख पुराणांमधे मी ऐकलेला नाही. असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.

तानसेनाने शिव आणि हनुमान यांना माता समजून या देवतांचे स्वभाव व गुण या रागात आहेत असे प्रतिपादन केले. असे कसे हे मला उमगलेले नाही. भैरव, मालकोश (मालकंस), हिंदोल, श्री, मेघ आणि दीपक या रागांचे स्पष्टीकरण त्याने या देवतांचे उदाहरण देऊन केले असे म्हणतात. त्या काळात राग ( पुरूष) रागिणी ( स्त्री) व पुत्र ( रागांचे पुत्र) याप्रकारे रागांचे वर्गीकरण करण्यात आले. अर्थात नवनवीन रागांना यात समाविष्ट करण्यात अडचण येऊ लागल्यामुळे या पद्धतीचा नैसर्गिक मृत्यू झाला व त्याची जागा “थाट” यांनी घेतली.

बसत खान आणि वज़ीर खान यांनी हे सगळे शास्त्रात बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्यांनी मेल ही संकल्पना मांडली. मेल म्हणजे आताचे थाट. थाट म्हणजे स्वरसमूह. राग निर्माण करण्याची क्षमता असलेले सात स्वर एका विशिष्ट पद्धतीत रचून त्यातून कर्णमधूर व मनाला / आत्म्याला भावणार्‍या रचनांना त्याप्रकारचा थाट म्हणतात. १२ थाट/मेल आहेत असे त्या काळात मानले जाई. आता १० थाटच माहीत आहेत किंवा वापरले जातात. या दोघांनी मुख्य सहा रागांचे सहा मुख्य मेल असा सिद्धांत मांडला. त्यांनी राग, रागिणी यांच्यातील साम्य किंवा फरक हा मेलांमधील तसेच वादी, संवादी स्वरातील फरकावर अवलंबून असतो असाही सिद्धांत मांडला.

वादी स्वर : एखाद्या रागातील सर्वात जास्त महत्वाचा स्वर. हा अर्थातच त्या रागाच्या रचनेत सगळ्यात जास्त वापरला जातो. यालाच अंशस्वर असेही म्हणतात.
संवादी स्वर : मुख्य स्वराबरोबर वापरल्या जाणार्‍या स्वरांना संवादी स्वर म्हणतात. नावाप्रमाणे या स्वरांना वादीशी संवाद साधावा लागतो, कारण तसे झाले तरच ते यशस्वीरित्या वापरता येतात. तसे नाही झाले तर संगीत बेसूर होण्याची शक्यता असते.

या १२ मेलच्या सिद्धांतानंतर त्यात बदल केला तो पंडीत भातखंडे यांनी.

श्री. भातखंडे.

त्यांनीच १० थाटांची संकल्पना मांडली व तीच आता सर्वार्थाने रूढ आहे. आपल्याला माहीतच आहे की पंडीत भातखंडे यांनी वज़ीर खान यांच्याकडे काही काळ तालीम घेतली होती. त्या काळात त्यांनी त्यांच्याकडून बरेच संगीत अवगत केले. विशेषत: धृपद.

सम्राट अकबराच्या दरबारातील एक रत्न म्हणून आपल्याला तानसेन माहीत आहे पण अबू फज़लने तो भरतऋषींनंतरचा हिंदुस्थानात होऊन गेलेला सगळ्यात थोर असा संगीतकार व गायक होता असे नमूद केले आहे आणि असे अकबराचेही मत होते असे म्हटले आहे. तानसेन स्वत: गुरू शिष्य परंपरा मानणारा होता आणि तो अवधचे बाबा रामदास आणि वृंदावनचे स्वामी हरिदास यांना गुरू मानायचा. हे दोघेही संगीताला शंकराचा अवतार मानायचे आणि हनुमानाला ते संगीत लोकांपर्यंत पोहोचवायचे काम स्वत: शंकराने सांगितले आहे असे मानायचे. अर्थात तानसेनचेही शेवटपर्यंत तेच म्हणणे होते. तो जरी अरेबिक आणि पर्शियन संगीताच्या संपर्कात आला होता तरीही.

मागे म्हटल्याप्रमाणे भारतीय संगितावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अरेबिक, इजिप्त व ग्रीक संगिताचा प्रभाव पडला होता तो तानसेन यांच्या गायनावर ही पडला नसता तर नवलच. हा प्रभाव पडला त्यांचे एक अध्यात्मिक गुरू पीर मुहम्मद गौस, जे ग्वाल्हेरला असायचे, त्यांच्याकडून.

पीर मुहम्मद गौस यांचा दर्गा.-

तानसेन हा स्वत: एका बनारसी गौड
ब्राह्मणाचा मुलगा होता आणि त्याला स्वामी हरिदास यांनी नादब्रह्मविद्या प्रदान केली तर ग्वाल्हेरच्या या पिराने त्याला सुफी संप्रदायाची आणि त्या तत्वज्ञानाची ओळख करून दिली. जरी त्याने एका मुसलमान स्त्रीशी लग्न केले असले तरीही त्याने वैदिक परंपरा सोडल्या नव्हत्या आणि त्या पाळण्यात त्याला कसल्याही अडचणी आल्या नाहीत. त्याच्या जीवनात व संगीतात त्याने वेद, भक्तीरस आणि सुफी संगीत याचा मेळ घालून त्याने संगीत व स्वत:चे जीवन अशा उत्तुंग पातळीवर पोहोचवले की त्याच्या जवळपास जाणे केवळ अशक्य आहे. या प्रभावामुळे त्याच्या रचनांमधे जसे हिंदू देवदेवता आल्या तसेच प्रेषित मोहम्मदही आले. वज़ीर खान यांनी या सुफी प्रभावाबद्दल काय म्हटले आहे ते बघू -
” संगीताची सुरवात ही एका पक्षामुळे झाली असे पर्शियन दंतकथा सांगते. या पक्षाचे नाव होते मौसिकार. याच्या चोचीला सात भोके होती आणि याचा वापर करून तो सात स्वर काढायचा. याच स्वरापासून सा..रे..ग.. हे सात मूळ स्वर निर्माण झाले.”

पर्शियन आणि अरब विद्वान हे ग्रीक तत्ववेत्ता व गणिती पायथागोरसला संगीतावरचे पहिले पुस्तक लिहिणारा मानतात. पायथागोरसने त्याचे संगीतावरचे पहिले पुस्तक ५०० बी.सी मधे लिहिले, ते होते “ मौसिकी”. ग्रीक भाषेत मौ म्हणजे हवा आणि सिके म्हणजे गाठ. मौसिके याचा अर्थ होता हवेत गाठ मारणे. याचा संदर्भ बहुतेक फुंक मारून वेगवेगळे स्वर काढणे हा असावा. कल्पना नाही. या पुस्तकामुळे पर्शियन आणि अरेबियन लोक संगीताला मौसिकी म्हणत. पायथागोरस हा सांख्यवादी होता आणि त्याने भारतात येऊन संगिताची मुलभूत तत्वे आत्मसात केली होती असेही म्हणतात व त्यावरही अनेक लेख आपल्याला सापडतील.

तानसेनच्या परंपरेमधे अजून एका व्यक्तिमत्वाचा उल्लेख सापडतो. तो म्हणजे अरस-ता-तालीस.

अरस-ता-तालीस

हा अरस-ता-तालीस म्हणजे दुसरा कोणी नसून आपण ज्याला आरिस्टॉटल म्हणतो तोच. याला तीन अरब शिष्य होते त्यांची नावे ज्यांचा उल्लेख सापडतो ते होते हकीम सुखरात, हकीम बोखरात आणि हकीम जालिनूस.

पर्शियाचा राजा मरून रशीद याच्या काळात या वरील तीन हकिमांची परंपरा एका थोर संगीततज्ञाने पुढे चालवली. त्याचे नाव होते कुंदी.
हरून अल रशीद
याने पायथागोरसचे हे लेखन अरेबिकमधे भाषांतर केले आणि पर्शियन शास्त्रज्ञ अबू अली सिना (ज्याला पाश्चात्य देशात एव्हिसेना म्हणून ओळखले जाते) याने या सगळ्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

हरून अल्‌ रशीद

खलिफा हरून अल्‌ रशीद जेव्हा बगदादवर राज्य करत होता, तेव्हा संगितावर आलेली बंधने झुगारून संगिताच्या क्षेत्रात आनेक रत्ने झळकली. उदा. सायेब, अशिब, तायिब, नासीर, इब्राहीम मुसली अणि इसाक बीन इब्राहीम. ग्वाल्हेरच्या पीर साहेबांना वर उल्लेख केलेल्या संगीततज्ञांच्या परंपरेतून संगीताचे धडे मिळाले व तानसेन यांच्या परंपरेत याच काळात त्यामुळे अरेबिक संगिताचा शिरकाव झाला.

हज़रत महोम्मद गौस यांच्याच काळात हे होत होते असे समजायचे काही कारण नाही. उत्तर भारतातील संगितावर तुर्कस्तानच्या संगिताचा प्रभाव पार शक आणि हुणांपासून पडत आला होता. तुर्कस्तानचे संगीत हे पर्शियाच्या संगीताला जवळचे होते. पठाण जेव्हा दिल्लीवर राज्य करत होते म्हणजे जेव्हा मुहम्मद तुघलक राज्य करत होता, त्या काळाच्या आसपास खुस्रोने दिल्ली दरबारात पर्शियन संगीत पेश केले.

अमीर खुस्रो.

त्याने पर्शियन पद्धतीचे संगीत दरबारात आणले आणि त्याला नाव दिले कव्वाली. हे जे पर्शियन संगीत होते याचा पाया होता १२ मौकामिस (मुख्य राग), २४ सुभास (रागिनी) आणि ४८ गुस्सा (उपराग). हिंदुस्तानी आणि पर्शियाच्या मिलापामधून त्याने अनेक नवीन राग निर्माण केले असे म्हणतात.

अमीर खुस्रोच्या काळातील अजून एक थोर संगीततज्ञ आपल्याला सिनेमामुळे माहीत आहे आणि तो म्हणजे बैजू बावरा.

बैजू बावरा

यांनी संस्कृत संगीतातील प्रबंध गायकीचे ध्रुपद गायकीत रुपांतर केले. बैजू बावरा हे राग आणि रागिणीचे फार मोठे तज्ञ होते. दुर्दैवाने पठाणांच्या सरकारी/दरबारी कव्वाली पद्धत रुजू झाल्यामुळे ध्रुपदाला तेथे अजून स्थान मिळाले नव्हते.

पठाणी सत्तेचा अंत झाल्यावर ग्वाल्हेरचे राजा मानसिंग तोमर यांनी स्वत:च्या दरबारात चार थोर गायक/वादक नेमले. त्यांची नावे होती भाम, चर्जू, धुंडीवर आणि चंचल. संगीत नायक अशी पदवी देऊन त्यांना दरबारी मानाच्या जागा दिल्या. याच वेळी या चौघांमुळे कव्वाली हा प्रकार मागे हटवून ध्रुपद गायकीने आपले महत्व परत प्रस्थापित केले. ग्वाल्हेरचे पीर गौस हे राजा मानसिंगचे चांगले मित्र होते आणि जरी पर्शियन संगीत येथे रुजवण्यामधे त्यांचा महत्वाचा सहभाग असला तरीही ध्रुपद गायकी आणि भक्तीमार्गाचा त्यांचा चांगला अभ्यास होता आणि ते त्याचे पुरस्कर्तेही होते.
राजा मानसिंग तोमर -

वृंदावन येथे स्वामी हरिदास हे बैजूबावरा यांच्या ध्रुपद गायनाची पद्धत वापरत असत पण त्यात त्यांनी अतोनात गोडवा भरला होता. तीच पद्धत ते शिकवतही असत. त्यामुळे तानसेनच्या संगीतात ध्रुपद गायनाचाही शिरकाव झाला. एवढेच काय पीर घौस यांनीही तानसेनला ध्रुपद गायन शिकण्यासाठी व गाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले.

सम्राट अकबर.

अकबराचे जे सर्व धर्मांना सामावून घ्यायचे धोरण होते, त्यानुसार त्याने तानसेनला त्याचा संगीताचा गुरू म्हणून नेमले. लक्षात घ्या, त्या काळात गुरूचे महत्व वादातीत असे. अकबराने तानसेनला आपल्या दरबारातही जागा दिली आणि त्याचवेळी त्याला गुरूपदही दिले. ही नाती त्या दोघांनी कशी निभावली असतील हे ते दोघेच जाणोत. तानसेन अकबराचा गुरू असल्यामुळे दरबारात ध्रुपद गायनाचे महत्व आता खूपच वाढले आणि ते सर्वोच्च संगीत मानले जाऊ लागले. या काळात अकबराने त्याच्या दरबारात ’ती’ प्रसिद्ध नऊ रत्ने नेमली आणि त्यांना मानाच्या जागा दिल्या. याच सुमारास तानसेनने अनेक नवीन रागांची भर घातली. त्यातील काहींची नावे आपल्या परिचयाची आहेत – दरबारी कानडा, दरबारी तोडी, मियाँकी मल्हार, सारंग इ. इ. त्याने जवळवळ १००० ध्रुपदे रचली. ( मला वाटते सध्या जो शब्द “ध्रुवपद” आहे तो यावरूनच आला असावा.) याच्यातील बरीच देवदेवतांचे स्तवन करणारी होती तर काही राजांची स्तुतीगीते होती. या सर्व संगीतात वेदांत, भक्तीरस आणि सुफी संगीताचा सुरेख संगम आढळतो. सध्या जी सुफी गाणी आपल्याला ऐकायला मिळतात त्यात आपल्याला याचा थोडासा भास होईल.

ध्रुपद गायन हे मुख्यत: मंदिरात देवासाठी केले जात होते त्यामुळे त्याचा मूळस्वभाव हा फारच गंभीर होता. तानसेनने त्यात गमक आणि मिंड इ. गोष्टी वापरून ते गाणे अधिक रंगतदार केले आणि त्यामुळे ते जनसामान्यात लोकप्रिय झाले. अकबराच्या पाठिंब्यामुळे त्याने लवकरच ध्रुपद्गायनाची शाळा चालू केली. रबाब मधून रुद्रवीणा/सरस्वती वीणा तयार करण्यात त्याचे महत्वाचे योगदान होते असे म्हणतात पण मला वाटते हे तितकेसे बरोबर नसावे कारण वीणा त्याहूनही प्राचीन आहे असे वाटते. नशिबाने त्याच्या वंशजांनी आणि शिष्यांनी त्याची ही थोर संगीताची परंपरा चालू ठेवून आपल्यावर आणि आपल्या येणार्‍या पिढ्य़ांवर उपकारच करून ठेवले आहेत. त्याच्याच काही वंशजांनी रचलेले काही राग बघा – बिलासखानी तोडी, तिलककामोद, पुरियाकल्याण, कौशिकीकानडा इ. इ….

या वंशजांनी आणि शिष्यांनी गौहर बानी –शांतरस जो सुमधूर शांत स्वरांनी उत्पन्न केला जायचा, डागोरबानी – श्रुंगार रस – जो गमकांनी आणि वक्रताना घेऊन उत्पन्न केला जायचा, खंडरबानी-करूण रस- जो स्वरात जलद कंपने आणून उत्पन्न केला जायचा, नौहरबानी-वीररस – जो या स्वरांवरून त्या स्वरावर जात मोठ्या तडफेने गात उत्पन्न केला जायचा याची परंपरा चालू ठेवली आणि त्यात भरही घातली. उत्तर हिंदुस्थानात जी वाद्ये तयार होत गेली तीही याच चार पद्धतींना अनुसरूनच झाली. उदा. वीणा, रबाब, सुरसिंगार आणि सतार. शाह सदारंग हा तानसेनचाच वंशज होता असे मानले जाते, त्याने ख्याल गायकीचा पाया रचला.

वीणा.

रबाब

सुरसिंगार

सतार

थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की सध्या जी संगीताची घराणी आपल्याला दिसतात आणि जी अभिमानाने आपली परंपरा चालवतात त्या सर्वांचे मूळ तानसेनच्या घराण्यात आहे.

क्रमशः
जयंत कुलकर्णी.
पुढच्या भागात या सर्व वाद्यांचे आवाज आपण ऐकणार आहोत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की वाद्ये कशी बदलत गेली किंवा त्यांचा गंभीर स्वभाव म्हणजे काय……

Posted in प्रवर्ग नसलेले | १ प्रतिक्रिया

फजिती

फजिती !

३१ डिसेंबरला कुठल्यातरी एका मित्राच्या घरी जमून नव्या वर्षाचे स्वागत करायचे हे आमच्या मित्रमंडळाचे ठरलेलेच. आम्ही नऊ मित्र म्हणजे अगदी जवळचे आणि एकामेकांची टिंगल टवाळी हीही नित्याचीच. हसायला कोणाला आवडत नाही ? त्यात एखाद्याची फजिती झाली तर मग काही विचारू नका आणि ती जर ठरवून केली असेल तर मग तर काही विचारलायलाच नको. आम्ही सगळे यात माहीर होतो. माणसाची प्रवृत्तीच आहे ना ती. अगदी केळ्याच्या सालीवरून एखादा माणूस घसरून पडला आणि जखमी झाला तरी बघणार्याीची पहिली प्रतिक्रिया ही फिदीफिदी हसण्याचीच असते. मी व माझे मित्रही याला अपवाद कसे असतील ? मागच्याच थंडीत ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत आमच्या मित्राच्या नवीन बंगल्यात करायचे ठरले. तेव्हाची ही गोष्ट. नुकताच त्याने कोकणात नांदोसला हा बंगला बांधला होता. सगळे ३० तारखेलाच नांदोसला पोहोचले होते व मी गोव्याहून ३१ला दुपारी पोहोचणार होतो. दुपारी नांदोसला पोहोचल्यावर माझे राजेशाही स्वागत करण्यात आले. मला एखादा नवीन लेफ्टनंट त्याच्या रेजिमेंटला रुजू होतो त्याचीच आठवण झाली. मला घ्यायला कट्ट्यावर गाडी देखील घेऊन आले होते ते. माझे असे स्वागत झालेले बघून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. “आज माझा बकरा करायचा विचार दिसतोय यांचा” मी मनाशी म्हटले. बंगल्यावर पोहोचल्यावर तर कमालच झाली. तेथे फटाके उडत होते. आता माझी खात्रीच झाली. “काळजी घेतलेली बरी” मी मनाशी हसून स्वत:ला बजावले. त्या संध्याकाळी सर्वजण माझ्या नवीन पुस्तकाचे अगदी तोंड फाटेतोपर्यंत कौतूक करत होते. आश्चर्यच आहे माझा साधा लेख न वाचणारे आज माझ्या पुस्तकाबद्दल बोलत होते. मला जागेवर दारूचा ग्लास भरून मिळत होता आणि सगळे नियम धडाधड वाकवले जात होते. माझ्या अत्यंत फालतू विनोदाला सगळे मनापासून दाद देत होते. आता मात्र एखाद्या शिकारी कुत्र्याला त्याच्या सावजाचा वास यावा तसा मला माझ्याच फजितीचा वास येऊ लागला. “सावधान!” मी स्वत:ला सावध केले. यांनी काय बरं गंमत करायची ठरवली असेल माझी? मी सगळीकडे जरा सावध नजरेने बघू लागलो आणि खोटं कशाला बोलू ? थोडासा अस्वस्थही झालो. माझ्या नजरेतून आता काहीही सुटत नव्हते. त्या आठजणांपैकी कोणी वेगळे वागतोय का ? बोलतोय का ? हे तपासून पाहू लागलो. त्याची मनात उजळणी करू लागलो. आता मला सगळ्यांचाच संशय येऊ लागला. त्यातून त्यांचा बिचारा म्हातारा नोकरही सुटला नाही. काहीच झाले नाही व होत नाही हे बघून माझी बेचैनी अजूनच वाढली व मी ती लपवण्याचा अटोकाट प्रयत्न करू लागलो. एका मित्राकडून मी माहिती काढायचाही प्रयत्न केला पण छे ! कोणी ताकास तूर लागू देईना.
शेवटी डोळे जड झाल्यावर झोपायची वेळ झाली आणि सगळे झोपायला निघाले. आमच्या एका मित्राला झोपण्यासाठी स्वत:साठी वेगळी खोली लागायची. त्या एका वेगळ्या खोलीसाठी तो काहीही करायला तयार असायचा. पण आज ऐकावे ते नवलच. “ मला झोपायला जरा वेळ आहे. मी अजून एखादा पेग घेऊन मग झोपेन. नाहीतर तू असं करना तू झोप त्या खोलीत. मी झोपेन येथेच बाहेर” मी नको म्हटल्यावर सगळ्यांनी मला जवळजवळ ओढतच त्या खोलीकडे नेले. का ? का बरं आज असं ?
मला गुडनाईट म्हणून त्यांनी माझा निरोप घेतला आणि ते त्यांच्या दारुकामात परत मग्न झाले. मी त्या खोलीत पाऊल टाकले आणि दरवाजा लोटून स्तब्ध उभा राहिलो. मला खात्री होती ते बाहेर माझी फजिती बघायला टपून बसलेले असणार. बाहेर मला कुजबुजण्याचा आणि हसण्याचा आवाज आला. साले ! माझी फजिती करताय काय…… तेवढ्यात बाहेर पावलांचाही अवाज झाला. मी त्या खोलीवर माझी शोधक नजर टाकली. भिंती, फर्निचर, छत, एक झुंबर, टाईल्स, भिंतींवरच्या फ्रेम्स.. पडदे…पण प्रथमदर्शनी मला काहीच संशयास्पद दिसले नाही. चायला ते दाराच्या फटीतून बघत असणार…मी स्वत:ला बजावले.
आता बहुतेक ते लाईट घालवतील, त्याच्या आधीच मेणबत्तीची सोय करून ठेवलेली बरी म्हणून मी नोकराकडून त्या मागावून घेतल्या. त्याने दोन आणल्या तर मी अजून तीन मागवल्या. मी एक पाऊल हळूच पुढे टाकले. हो ! कुठे दगाफटका होईल सांगता येत नाही. मी परत त्या खोलीवर चौफेर नजर टाकली. काहीच नाही ! मग मात्र मला चेव चढला. मी आता त्या खोलीतील प्रत्येक वस्तू तपासायची ठरवले. एका मागून एक वस्तू मी खालून वरून तपासून बघितल्या. एका घड्याळातील सेलही मी काढून टाकले व फोनही काढून ठेवला. मग मी खिडकीकडे गेलो. त्याची मोठी तावदाने उघडी होती. तेथून बाहेर बघून मी त्या दोन खिडक्या काळजीपुर्वक बंद केल्या आणि त्यावर पडदेही ओढून घेतले. येणारा आडखळावा म्हणून त्यांच्या समोर दोन खुर्च्याही ठेवल्या. चला आता बाहेरून तरी काही धोका नाही.
समोरच एक आरामखुर्ची होती, ती मी गदागदा हलवली आणि मग त्या जड आरामखुर्चीवर मी अत्यंत काळजीपूर्वक सावकाश बसलो. त्या भल्यामोठ्या पलंगावर झोपायचा मला काही धीर होईना. पण आता मध्यरात्र उलटून गेली होती आणि माझ्या मनात एक विचार आला “ काय बावळटपणा चालवला आहेस तू ? त्यांना जर खरोखरच माझी फजिती करायची असती तर त्यांनी ती न झालेली पाहून केव्हाच हात पाय पसरले असतील. मी कशाला जागत बसलोय ? कदाचित माझी ही अस्वस्थता बघुनच त्यांची करमणूक होत नसेल कशावरून ? हा विचार मनात येताच माझ्या मनात झोपेची तीव्र इच्छा झाली आणि मी पलंगाकडे गेलो खरा पण परत थबकलो. कशावरून या पलंगाची फळी खाली पडणार नाही आणि मी गादीसकट जमिनीवर पडणार नाही ? आणि त्याचा आवाजही चांगला मोठा येईल…. म्हणजे सगळ्यांना समजेल…कदाचित मी आडवा झाल्यावर वरून एखादा पाण्याचा शॉवर चालू होऊन मला रात्र कुडकुडत काढावी लागेल ! काय सांगता येतय यांचे……आता मला या कटाला अजिबात बळी पडायची इच्छा नव्हती. मी गादी एका टोकाकडून पकडली आणि हळू हळू माझ्या बाजूला ओढली. काही झाले नाही. मी शेवटी त्यावर झोपायचे ठरवले. पण शेवटची काळजी म्हणून मी हलणार्‍या सर्व वस्तू त्या खोलीच्या दरवाज्याच्या समोर आणून ठेवल्या. गादीवरची चादर एकदा झटकून परत घालणार होतो…..पण नकोच…साला त्यात खाजखुजली टाकली असेल तर ? ती चादर टाकून देऊन मी सर्व दिवे बंद केले आणि त्या पलंगावर पडलो. तसा एक तासभर तसा मी जागाच होतो….शेवटी कधी झोप लागली ते कळालेच नाही………मी बराच वेळ झोपलो असणार पण माझ्या अंगावर एक जाडजूड माणूस पडला. त्याच्या वजनाने मला श्वासही घेता येईना…. आणि मी किंचाळत उठलो….

बाहेर मस्त प्रकाश पसरला होता, मंद वारा सुटला होता, गरमागरम कॉफीचा सुवास सगळीकडे दरवळत होता आणि सगळे जण माझ्या भोवती उभे राहून हसत मला विचारत होते “ काय रे स्वप्न बिप्न पडलेकी काय……..?
मी मात्र खजील होऊन हासत हासत त्या कॉफीच्या वासामागे गेलो……………….

जयंत कुलकर्णी
गी द मुपासाँच्या “The Uncomfortable Bed” या गोष्टीचा स्वैर अनुवाद.

Posted in कथा | यावर आपले मत नोंदवा

पानगळ !

पानगळ !

पाँडिचेरीची आपली एक स्वत:ची वेगळीच संस्कृती आहे. फ्रेंचांची वसाहत असल्यामुळे या भागात फ्रेंच आणि तामीळ संस्कृतीचे एक सुरेख मिश्रण आपल्याला आढळते. अजूनही बरीच फ्रेंच कुटूंबे येथे तग धरून आहेत. काही तरूणांनी येथील स्थानिक घरांशी घरोबा केल्यामुळे अजून एक मिश्र संस्कृती जन्माला आली आणि त्यात तामिळ सुसंस्कृतपणा आणि फ्रेंचांचा धाडसीपणा या गुणांचा एक सुरेख संगम आपल्याला यांच्या पुढच्या पिढ्यांमधे आढळेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे फ्रेंच लोकांची कलासक्तीही या पिढ्यांमधे पुरेपूर उतरली आहे. मी जे सांगतोय ती परिस्थिती साधारणत: १९४२-४३ सालातली. आता सगळी फ्रेंच कुटुंबे फ्रान्सला परतली आहेत, अर्थात एखादे कुटूंब हट्टाने येथे तग धरून राहिले असेल, नाही असे नाही पण जी काही कुटूंबे येथे राहीली आहेत त्याचे मुख्य कारण आहे येथील स्वस्ताई. आपण जर पाँडिचेरीला गेलात तर आपल्याला फ्रेंच आणि भारतीय संस्कृतीचा मिलाप असलेल्या अनेक इमारती अजूनही दिसतील. मला तर वाटते या दोन संस्कृतीच्या मिलापामुळे जी नवीन पिढी तयार झाली त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमधेही बराच बदल झालेला असणार. शेवटी दोन्ही जिन्सचे गूण नवीन पिढीत उतरत असणारच ना !

पाँडिचेरीचे पुड्डूचेरी झाले तरीही या आगळ्या वेगळ्या संस्कृतीच्या या खुणा या शहराने अजूनही जपून ठेवल्या आहेत. त्यात ना कोणाचा धर्म आड आला ना विचार. पाँडिचेरीत, आपण जर इस्ट कोस्ट रोड पकडलात तर आपण एका छोट्याशा पण सुंदर ऐय्यननरप्पन देवळापाशी पोहोचाल त्याच्या शेजारी फार पूर्वी मोकळे मैदान आणि घनदाट झाडी होती. त्या नयनरम्य जागेत एक छोटीशी वस्ती वसलेली होती. १०/१५ वर्षापूर्वी एक फ्रेंच कलाकार फ्रान्स आणि पाँडिचेरीतील महागाईला कंटाळून या शांत वातावरणात वस्तीला आला आणि तेथेच राहिला. त्याने जी चित्रे तेथे जन्माला घातली त्यामुळे त्या गावाचे नाव जगप्रसिद्ध झाले आणि चित्रे विकत घेणार्‍यांचा राबता तेथे वाढला. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक तर त्या गिर्‍हाइकांसाठी रहाण्याच्या सोयी तयार झाल्या आणि इतर कलाकारांची पावले त्या गावाच्या दिशेला वळाली. कलाकारांसाठी तर हा स्वर्गच होता. इतर कलाकारांची गाठ पडायची, चर्चा झडायच्या. तेथे सुरू झालेल्या हॉटेलचे नावही बघा – व्हिंचीज ग्रास आणि एका टपरीचे नाव ही फारच कलात्मक – “कट इअर”. हळू हळू या गावात कलाकारांचे बंगले, कलाकारांचे स्टुडिओ, तीन मजली अपार्टमेंटस अशा सोयी तयार झाल्या आणि या गावाचे नाव झाले “रेनेसांस” त्याचे झाले रेंसांपूरम. रेंसांपूरममधे आपण ज्या संस्कृतीचा वरती उहापोह केला आहे त्याचा प्रचंड प्रभाव पडला आहे हे आपण तेथे गेल्यावर आपल्याला जाणवेलच. सुंदर फ्रेंच स्थापत्यशास्त्राचे नमूने आपल्याला येथे ठायी ठायी दिसतील. इमारतींच्या गुळगुळीत भिंती, मोठ्या खिडक्या, त्याला असणार्‍या विशिष्ट महिरपी..एखाद्या फ्रेंच खेडेगावात असल्याचा भास झाला नाही तरच नवल……

अशाच एका स्टुडिओ अपार्टमेंट्च्या इमारतीमधे दुसर्‍या मजल्यावर दोन मैत्रिणींचा स्टुडिओ अपार्टमेंट होता. त्यांची नावे त्या दरवाजावर होती “ कोंकणा बॅनर्जी आणि अमेलिया. कोंकणा होती बंगालची आणि तेथे गुरूकूलमधून आली होती तर अमेलियाचा आजोबा पाँडिचेरीचा होता. अमेलिया लहानपणीच पॅरीसला गेली होती आणि आता परत पाँडिचेरीला परतली होती. त्यांची गाठ मागच्याच वर्षी “कट ईअर”मधे पडली होती आणि संगीत, कला, सॅलाड, कॉफी पासून ते वाईनपर्यंत त्यांच्या आवडीनिवडी जुळल्यामुळे त्या आता चांगल्या घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या आणि दोघींनी मिळून एकच स्टुडिओ काढला होता. आयुष्य कसे शांत आणि मजेत चाललेलं होतं.

त्या नोव्हेंबरमधे या शांत आणि कलासक्त गावाला एका अनाहूत पाहुण्याने भेट दिली – “ स्वाईन फ्लू” अर्थात त्यावेळी या पाहुण्याचे नावही माहीत नव्हते. माहीत होते ते फक्त त्याचे पराक्रम. सर्दी, पडसे, घसा दुखणे, ताप, जास्त ताप, तिसरा दिवस आणि खेळ खलास. थोड्याच दिवसात रेनेसांपुरममधे या पाहुण्याची दशहत पसरली. नाजूक अमेलिया आणि या पाहुण्याची कोठे तुलना होणार ? दोघांची भेट झाली आणि अमेलिया अंथरुणाला खिळली. त्या संध्याकाळी ती तिच्या अंथरूणावर मलूल होऊन, गळ्यापर्यंत पांघरूण ओढून खोलीच्या त्या फ्रेंच खिडकीबाहेर शुन्यात नजर लावून पडली होती.
दुसर्‍याच दिवशी कोंकणाला जिन्यात अमेलियाला तपासायला येणारे डॉक्टर भेटले. अमेलियाला तपासत असताना त्यांनी कोंकणाला हाक मारली…जरा बाहेरच्या खोलीत ये….
“मला वाटते तिची बरं व्हायची शक्यता…………. दहात…..एक आहे. डॉ. थर्मामिटर झाडत म्हणाले. या डॉक्टरांना थर्मामिटर झाडताना बोलायची सवय का असते कोण जाणे. झटकत बोलताना ते फार तुच्छतापूर्वक बोलतात असे समोरच्याला उगीचच वाटते. “ या निराशावादी रुग्णांनी आमचे शास्त्र खोटे ठरवण्याचे ठरवलेले दिसते आहे.” ते हसून म्हणाले.
“तुझ्या या मैत्रिणीने तर मरायचेच ठरवले आहे. तिच्या मनाविरूद्ध काही भयंकर झाले आहे का ? काय आहे तिच्या मनात ?”
“हंऽऽऽऽऽ तिला एकदा हिमालय रंगवायचा आहे…..”
“ते एवढे महत्वाचे नाही. मी त्याबद्दल नाही बोलत. काही प्रेमभंग वगैरे……”
“प्रेम त्या इच्छेएवढे महत्वाचे………….. जाउदेत पण तसे काहीच नाही” कोंकणा.
“मग मला वाटते तिला जो भयंकर अशक्तपणा आलाय त्याचाच परिणाम असावा हा. हे बघ मी माझ्यापरीने आमच्या शास्त्रात जे काही सांगितले आहे त्यानुसार प्रयत्न करतोय पण हिने आता चितेतील गोवर्यायच मोजायच्या ठरवल्या असतील तर मी आणि वैद्यकीय शास्त्र तरी काय करणार ? औषधांचा बरे होण्यात फक्त पन्नास टक्केच सहभाग असतो.. तिने जर सावरून नवीन लागलेल्या सिनेमाची चौकशी केली तर मी म्हणेन तिची बरी व्हायची शक्यता १० त ………….५ होईल.”
कोंकणाला हसू आले. ’हा डॉक्टर काय प्रॉबेबलिटीने उपचार करतो की काय ”

डॉक्टर गेल्यावर मात्र भलतेसलते विचार मनात येऊन तिला रडूच कोसळले. रुमाल भिजल्यावर तिने तो धुण्याच्या कपड्यात फेकला आणि डोळे पुसत ती आपला इझेल घेऊन अमेलियाच्या खोलीत आली. वातावरण हलके करण्यासाठी तिने जुन्या हिंदी सिनेमातील एक छान तान घेतली आणि अमेलियाकडे नजर टाकली व दुसर्‍या टोकाला आपले काम चालू केले. ती एका जहिरात कंपनीसाठी एका तगड्या, रांगड्या शेतकर्‍याचे चित्र रंगवत होती. तिच्यासारख्या नवीन कलाकारांना अंगावर पडेल ती कामे करावीच लागतात. प्रसंगी आपली आवडनिवड बाजूला ठेवूनही. त्या समोरच्या कॅनव्हासवर पूर्ण ताकदीने पेन्सिलीच्या हळुवार रेषा उमटवत असताना तिला अस्पष्ट असा कण्हण्याचा आवाज आला. हातातील पेन्सील बाजूला ठेवून तिने पटकन पलंगाकडे धाव घेतली. अमेलियाचे डोळे सताड उघडे होते. तिच्या ह्रदयाचा ठोका चुकला. पण तिने खिडकीबाहेर नजर लावली होती आणि ती पुटपुटत उलट्या क्रमाने आकडे मोजत होती.
“बारा… अकरा……. दहा..नऊआठ………………………”
कोंकणाने खिडकीबाहेर तिने जेथे नजर लावली होती तेथे बघितले. काय होते तेथे मोजण्यासारखे ? शेजारच्या इमारतीची एक भिंत आणि त्यावर एक सुकलेला कसलातरी कसाबसा चढलेला वेल. पानगळीत त्या वेलाची बहुतेक पाने गळून गेली होती. काही टोकाला होती तीही गळण्याच्या अवस्थेत होती.
“अमेलिया, काय मोजती आहेस तू ?”
“सात ! ती आता पटापट पडताएत. परवा जवळ जवळ शंभर होती. मोजतानाच माझी दमछाक झाली. ते बघ अजून एक पडले. आता फक्त सहाच राहिली.
“ काय सहा, काय पाच ? अमेलिया, जागी हो !”
मोठ्या कष्टाने अमेलिया म्हणाली “ ती पाने ग ! त्या वेलीवरची पाने मोजतीए मी. शेवटच्या पानाबरोबर मी जाणार. हे मला परवाच कळले आहे. डॉक्टरांनी सांगितले नाही का तुला ?”
“काय वेडेपणा आहे हा ! त्या पानाचा आणि तुझा काही संबंध आहे का ? हा वेल तर तुला आवडत होता ना ? डॉक्टरांनी तर मला सकाळी सांगितले की तू आता बरी व्हायच्या मार्गावर आहेस. चल हा वेडेपणा आता बंद कर आणि मला माझे काम करूदे ! मी सूप करते, ते पी गरम गरम. बरे वाटेल तुला. माझे हे काम झाले की त्या पैशात आपण तुला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवू आणि तुझी आवडणारी वाईनही आणू !” कोंकणाने हसून सांगितले.
“वाईनची गरज भासेल असे वाटत नाही. नको त्यात पैसे खर्च करूस” अमेलिया खालच्या भकास स्वरात म्हणाली.
“मी ही खिडकी बंद करू का ? मला या उजेडाचा त्रास होतोय !”
“तू दुसर्‍या खोलीत नाही का करू शकत तुझे काम ? मला या पानांवर लक्ष ठेवायचे आहे”
“म्हणूनच मी ती बंद करणार आहे !”
“तुझे काम झाले की सांग मला. मी वाट पहाते आहे त्या शेवटच्या पानगळीची. कंटाळा आलाय मला आता या वाट पाहण्याचा”
“आता जरा डोळे मिटून गप्प पडशील तर बरं होईल” कोंकणा रागावून म्हणाली.
“मी खालच्या बेहरामजीला घेऊन येते. त्याचेही एक स्केच करायचे आहे याच कामासाठी. आलेच मी” असे म्हणून कोंकणा बाहेर पडली.

म्हातारा बेहरामजीसुद्धा एक कलाकार होता. त्याच्या कलेचा दर्जा काय ? हा एक संशोधनाचा विषय. त्या संशोधनाअंती तो त्या गावात एक चेष्टेचा विषय झाला होता हे मात्र खरे. आयुष्यातील साठ वर्षं ओलांडल्यावर त्याला आपण एक कलाकार आहोत याचा साक्षात्कार झाला होता आणि त्याने ते सिद्ध करण्यासाठी मायकेल एन्जेलोसारखी दाढीही ठेवली होती. बेहरामजी एक अप्रसिद्ध, हारलेला, अतिसामान्य कलाकार होऊन गेला असेही पुढे कोणी लिहिण्याचे धाडस करणार नाही एवढा तो सामान्य होता. अर्थात या सगळ्या मतांचा/चेष्टेचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता आणि पुढे होईल असे वाटतही नव्हते. बेहरामजीचा स्वत:वर प्रचंड विश्वास होता आणि त्यामुळे आपल्या हातून एक दिवस भव्य दिव्य कलाकृती जन्म घेईल याची त्याला खात्री होती. अर्थात ती तयार करायला त्याने अजून सुरवात केली नव्हती ही गोष्ट अलाहीदा. त्याचा चरितार्थ चालवायला तो मॉडेल म्हणून काम करत असे आणि त्याच्या स्वभावामुळे तो सर्व कलाकारांना प्रियही होता. जरा जास्तच झाल्यावर तो त्याच्या भव्यदिव्य कलाकृतीबद्दल बडबडायचा पण त्याच्या खोलीत एझेलवर लावलेल्या कॅनव्हासवर त्याने रंगाचा एक साधा ओरखाडाही उठवला नव्हता. त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वामुळे मृदू स्वभावाच्या माणसांवर त्याची करडी छाप पडायची हीच काय ती जमेची बाजू.

कोंकणा बेहरामजीच्या खोलीत पोहोचली तेव्हा तो त्या अंधार्‍या खोलीत त्याच्या कॅनव्हास समोर उभा होता. तोच कॅनव्हास जो गेले कित्येक वर्षात तसाच कोरा होता आणि वाट बघत होता. कोंकणाने अमेलिया कशाची वाट बघते आहे ते सांगितल्यावर बेहरामजीने हात झाडले आणि तो त्याच्या मजेशीर पारशी वळणाच्या बोलीत म्हणाला “ काय बोलते तुम्ही ? साला जगामंधी असे काय असते काय. अरे माणूस पान पडल्यावर मेला तर काय होनार ? साला मी तर असले कायबी एकले नाय. तिच्यासाठी साला कामच करायचा दिल करत नाय आता. काय वेडा हाय काय ती ? पण चांगला हाय हां ती डिकरी….”

“बेहरामजी ती आजारी आहे. तुला यायचे नसेल तर येऊ नकोस पण असे बोलू नकोस बाबा. मी तसेच काळजीत आहे.” कोंकणाने नाराजी दर्शविली.
“अरे तू रागवू नको बाबा. मीबी तेच म्हनतो ना. साला ही जागाच खराब हाय. माझा हे चित्र झाला ना की ते विकून आपण हे गाव सोडून एका चांगला गावात जाऊ. काय !” चल आता जाउ तुझ्या घरामंदी.”

ते दोघे कोंकणाच्या स्टुडिओत आले तेव्हा अमेलिया गाढ झोपली होती. खिडकीचे पडदे ओढून तिने बेहरामजीला पायाचा आवाज न करण्याची खुण करुन तिच्या मागे यायला सांगितले. त्या खोलीतून त्या दोघांनी एकामेकांकडे बघितले आणि कोंकणाने शांतपणे खिडकी उघडली. दोघेही स्तब्धपणे त्या वेलाकडे बघत राहिले. मनातील खळबळ कोणीच बोलेना. कदाचित त्या वेलाकडे बघत ते अमेलियाच्या आयुष्याचा विचार करत असावेत किंवा त्यांच्याही मनावर त्या पानांची गुढ गडद छाया पडली असेल. शांतता होती हे खरे. बेहरामजीने न बोलता (हे कधी होत नसे) आपली जागा घेतली आणि कोंकणाने आपले काम सुरू केले. रात्रभर वारा भणाणत वहात होता आणि दुरवर कुत्र्यांचे रडणे ऐकू येत होते. मनावर दडपण आणणारे वातावरण !

सकाळी कोंकणा उठली तेव्हा तिला अमेलिया डोळे सताड उघडे ठेवून पडद्याकडे भकास नजरेने पहात होती.
“उघड ती खिडकी, बघू दे मला” अमेलिया किंचाळली.
हताश होत कोंकणाने खिडकी उघडली.
काल सुटलेल्या वादळी पावसातही त्या वेलावर एक पान तग धरून होते. एकच शेवटचे पान. पिवळसर हिरवे आणि सुकलेले.
“हे शेवटचे पान. काल रात्री वार्‍यात ते पडले नाही हे नवलच आहे. पण आज ते पडेल आणि मी या जगात नसेन.” अमेलिया रडक्या पण ठाम स्वरात म्हणाली.
“अग तुला असे बोलताना काहीच कसे वाटत नाही ? माझातरी विचार कर थोडा ! कोंकणालाही रडू कोसळले.
पण अमेलियाने उत्तर दिले नाही. माणसाला या लांबच्या गुढ प्रवासाला निघताना फार एकटे वाटत असावे. आणि येथे तर अमेलियाने एका वाळक्या पानाशी आपले आयुष्य जोडले होते. हे नाते इतर नात्यांपेक्षा तिला आता फारच घट्ट वाटत होते.

दिवस असाच उदासवाणा पार पडला. संधिप्रकाशातही ते पान त्यांना दिसत होते. रात्र होताच वारे सुटले आणि कोंकणाने खिडक्या बंद केल्या. उजाडल्यावर अमेलियाने परत चिडचिड करत ती खिडकी उघडण्याची आज्ञा केली.
ते पान अजून तसेच तेथेच होते.

अमेलियाने एक दिर्घ श्वास घेतला आणि त्या पानाला प्रेमाने नजरेने कुरवाळले. मग तिने कोंकणाला हाक मारली.
“ कोंकी, मी खरच फार दुष्ट आहे ! माझा दुष्टपणा उघडकीस यावा म्हणूनच ते पान तेथे अजून तग धरून आहे. फारच वाईट वागले मी तुझ्याशी. मला थोडीशी कॉफी देतेस का ? आणि एक आरसाही दे. जरा मला हात दे, आणि बसते कर मला. मला तुझ्याकडे जरा डोळे भरून बघू देत. तुझी माफी मागायची म्हणजे गुन्हाच ठरेल.”

थोड्याच वेळात अमेलियाच्या ओठातून तिची इच्छा बाहेर पडली “ एखाद्या दिवशी मी हिमालय रंगवणार हे निश्चित”.

दुपारी डॉक्टर आले आणि कोंकणाची अमेलियाच्या बडबडीपासून सुटका झाली. डॉक्टरांना सोडायला ती जिन्यापर्यंत गेली. डॉ. म्हणाले “ मला वाटते तिला आता कसला धोका उरला नाही. थोडी काळजी घेतलीत तर ठणठणीत होईल ती.”

त्या दुपारी कोंकणा अमेलियाच्या पलंगापाशी आली आणि तिने तिला परत बसते केले. “अमेलिया मला तुला काहितरी सांगायचे आहे.
“कालच बेहरामजी गेला. तो म्हणे गेले दोन दिवस त्या विचित्र तापाने आजारी होता. सफाईवाल्याला तो त्याच्या खोलीत जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याचे कपडे वाळूने माखले होते आणि तो थंडगार पडला होता. कुठे गेला होता तो रात्री कोणास ठावूक. त्यांना एक शिडी आणि हिरव्या पिवळ्या रंगाने माखलेले पॅलेटही सापडले. तुला आश्चर्य वाटत होते ना की ते पान का पडले नाही? ऐक,

त्या रात्री ते पान पडल्यावर तो त्या भिंतीवर ते पान रंगवत होता.”

जयंत कुलकर्णी.

O Henry च्या The Laeaf चे स्वैर भाषांतर.

Posted in कथा | 3 प्रतिक्रिया

हिंदुस्थानी संगीत व मियॉ तानसेन

स्वामी हरिदास तानसेनला विद्या शिकवताना.

मागे बादशहा अकबर उभा आहे. खरे खोटे माहीत नाही पण या चित्रामागे एक आख्यायिका आहे. अकबराने तानसेनला त्याच्या गुरूचे नाव विचारले आणि त्यांचे गाणे ऐकायची इच्छा व्यक्त केली. तानसेनाने बादशहाला सांगितले की ते फक्त परमेश्वराच्या दरबारात गातात, त्यामुळे ते आपण ऐकणे शक्य नाही. असे म्हणतात बादशाह स्वत: त्यांचे गाणे ऐकायला स्वामींच्या आश्रमात गेला व ते गाणे ऐकून धन्य झाला. मला हे जरा अशक्य वाटते पण सांगता येत नाही.

संस्कॄत ज्या संगीताचा पाया होता त्या शास्त्रीय संगीतात मुळ रागांना ग्रामराग म्हणत. आजच्या सर्व रांगांचे मुळस्थान हेच राग आहेत. ग्रामराग म्हणजे बहुतेक ग्रामीण लोकसंगीत असावे. हे राग गायच्या बर्यांच पद्धती होत्या. तेराव्या शतकात सारंगधर यांनी लिहिलेल्या संगीत रत्नाकर या संगीतावरील टिका ग्रंथात या पाच पद्धतींचा उल्लेख सापडतो.

शूद्ध गिती: यात एकच पण मृदू आवाजात स्वर लावून पण कानाला अत्यंत गोड लागेल अशी गायची पद्धत होती
भिन्न गिती: यात स्वरांना गमकांमधे वेगवेगळ्या लयीत गाण्याची पद्धत होती.
गौडी गिती: यात गायक तिसर्‍या सप्तकात स्वरांच्या कंपनांचा व थांबून थांबून परत स्वरांची आळवणी करत रंग भरत असे.
वेगस्वर गिती: याच्यात स्वरांना गतीत म्हटले जायचे व स्वरांची कंपनेही जलद गतीत देण्यात येत.
साधारण गिती: यात वेगळे काही नसून वरील चारांचे वेगवेगळ्या कल्पना वापरून एकत्रीत सादरीकरण केले जायचे.

संस्कृत संगीतानंतर मुळ ढाच्याला धक्का न लावता हिंदूस्थानी संगीत त्यातूनच निर्माण होत गेले. त्यातच ध्रूपद गायन हा एक महत्वाचा प्रकार अस्तित्वात आला. ध्रुपद गायकीचे आपल्याला ज्ञात असलेले चार प्रकार आहेत ( ज्याला बाणी/बानी म्हणतात ). वरील ज्या गिती आहेत त्यांचा वापर करून या चार पद्धती विकसीत झाल्या असे म्हणायला हरकत नाही.

गौधरबानी – शुद्ध गितीतून तयार झाली. स्वत: तानसेन याच पद्धतीने ध्रूपद गायचा. एकाच शूद्ध स्वरात सरळ साध्या मिंड घेऊन ध्रूपद गाणे हे फार अव्हानात्मक असे. असे गाऊन संगीतात रंग भरणे हे त्याहूनही अवघड असणार. तानसेन व त्याचा मुलगा बिलासखान या बाणीचे खंदे पुरस्कर्ते होते.

डागोरबानी : ही तयार झाली भिन्नगितीतून. चक्राकार गतीने मिंड घेऊन भरफूर गमकांचा वापर करून एका वेगळ्या प्रकारची अनुभुती ऐकणार्यांिना येत असे. तानसेन यांचे गुरू हरिदास स्वामी हे वृंदावन येथे देवळात कृष्णाच्या मुर्तीसमोर या प्रकारचे गायन करत असत. ही परंपरा चालू ठेवली सरस्वती देवी या स्त्रीने. ती तानसेनची मुलगी आणि त्यावेळी अत्यंत प्रसिद्ध अशा वीणा वादक मिस्रीसिंग यांची पत्नी होती.

खंडरबानी – ही तयार झाली वेगस्वरातून. याच्यात वेगवान गमकांनी संगीतात रंग भरण्यात येई. बज बहादूर व मिस्रीसिंग हे या गायकीचे प्रसिद्ध कलाकार होते. यांच्या पुढच्या पिढीने डागोर व खंडर या दोन्ही पद्धतींचा स्विकार केला.

नौहरबानी – ही तयार झाली गौडगिती मधून. एका स्वरांवरून दुसर्याढ स्वरांवर सहजपणे गमक घेत हे कलाकार संगीतात रंग भरायचे. या गायकीचे प्रमूख गायक होता श्रीचंद जो हरिदास स्वामींचा शिष्य होता.

संगीतसम्राट तानसेन याने स्वत: एक रचना करून या चार बाणींचे महत्व विशद करून सांगितले आहे. तो म्हणतो – सर्व बाणींचा राजा आहे गौधर. खंदर हा सेनापती, डागोर हे मंत्री तर नौहर ही कारभार सांभाळणारा अधिकारी आहे.. तानसेन जरी स्वत: गौधरबाणी गात होता तरीही त्याने इतर पद्धतींनाही तेवढेच महत्व दिले होते आणि तो या सगळ्यांची गरज आहेच असे ठामपणे प्रतिपाद करायचा.

दुर्दैवाने आता फक्त डागोरबाणीच आपल्याला ऐकायला मिळते. बाकीच्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या ऐकायलाही मिळत नाहीत. त्यांच्या बद्दल फक्त काही गाण्यातून उल्लेख सापडतो.
डागोरबानीचे हल्लीचे स्वरूप-गायक डागर बंधू
http://www.divshare.com/flash/audio_embed?data=YTo2OntzOjU6ImFwaUlkIjtzOjE6IjQiO3M6NjoiZmlsZUlkIjtzOjg6IjE2MjgxMjIyIjtzOjQ6ImNvZGUiO3M6MTI6IjE2MjgxMjIyLWYwNSI7czo2OiJ1c2VySWQiO3M6NzoiMTg2NzQxOCI7czoxMjoiZXh0ZXJuYWxDYWxsIjtpOjE7czo0OiJ0aW1lIjtpOjEzMjI1NzQzODU7fQ==&autoplay=default

संस्कृतमधील “पंचगीतात” ज्या प्रमाणे शब्दांना महत्व होते त्या प्रमाणे ध्रूपदगायनातसुद्धा त्या काळात शब्दांना महत्व होतेच. काही जणांना असे वाटते हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतात शब्दांना एवढे महत्व दिले जात नाही. उलट बाणी/बानी याचा अर्थच शब्द. म्हणजे ध्रूपद गायनात शब्द, भावना, रस व राग यांचा इतका सुरेख ताळमेळ घातला जायचा की बस्स… गौधरबाणीमधे असे राग व शब्द निवडले गेले की त्यातून शांतरसाची निर्मिती व्हायची. डागोरबानी मधे कर्णमधूर आणि भावना यांना जागा दिली गेली होती. त्यातून निर्मिती व्हायची मधूर/करूण रसाची. खंडरबानीमधे वीररस आणि नौहरबाणीमधे अद्‌भूतरसाची. हळू हळू हा ताळमेळ कमी होत गेला आणि अकबराच्या काळानंतर याचे महत्व कमी होत गेले.

मुगलसत्ता लयास गेली आणि ज्याप्रमाणे केंद्रस्थानी असलेली सत्ता लयास गेल्यावर इतर राज्यांना स्वातंत्र्य उपभोगायला मिळते त्याप्रमाणे या चार घराण्यांनीही स्वातंत्र्य उपभोगायला सुरवात केली. म्हणजे झाले काय की सर्व घराण्यांनी सर्व पद्धती आत्मसात करायला सुरू केले आणि ध्रूपदाच्या बाणींमधे सरमिसळ झाली. काही घराणी दोन किंवा तीन बाणीसुद्धा आपली मानू लागले.

१८व्या शतकात तानसेनच्या वंशजांनी तीन घराणी स्थापन केली. जयपूरच्या सेनीया/सेनी घराण्याने डागोरबाणी आपली मानली आणि त्यात प्रावीण्य मिळवले. याच घराण्यांच्या लखनौ, बनारस, रामपूर येथे या घराण्याच्या दोन शाखा उदयास आल्या. तानसेनच्या मुलाने जे घराणे स्थापन केले होते ते खरे तर गौधरबाणीचे पण त्यांनीही डागोरबानीही आत्मसात केली. याचे मुख्य कारण म्हणजे डागोरबानीचे रंजनमुल्य खूपच होते. जाफर खान, प्यारेखान आणि बसतखान यांनी त्यांच्या घराण्याची परंपरा चालू ठेवली. सेनीया घराण्याचे बीनवादक मिस्रीसिंह यांनी खंडरबानी आणि डागोरबानी स्विकारली. बेतीयामधे जे ध्रूपद गायक होते त्यांनी त्यांचे मुळ गुरू स्वामी हरिदास यांची खंडरबानी चालू ठेवली तर बिशनपूरला गौधरबानी गायकीचा अभ्यास केला गेला. मथुरेला डागोरबानी तर जयपूरलाही उस्ताद बहरामखान यांनी डागोरबानी स्विकारली आणि हे घराणे अजूनही डागोर/डागर या नावाने ओळखले जाते. हे घराणे आपली सुरवात खुद्द स्वामी हरदास यांनीच केली असे सांगतात आणि ते खरेही असावे. वर उल्लेख केलेल्या सर्व संगीतमार्तंडांनी नौहरबानी आपल्या संगितात वापरली त्यामुळे मला वाटते त्याचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट झाले असावे.

मुगलांच्या या आमदानीत उत्तर भारतात हिंदुस्थानी संगीताचा सोनेरी काळ अवतरला होता असे म्हणायला हरकत नाही. स्वामी हरिदास यांचे शिष्य संगीतसम्राट तानसेन यांच्या ज्ञानाच्या बिजाभोवती संगीतजगाची स्थापना होत होती, त्यात वेगवेगळे कलाकार प्रयोग करू लागले. या काळात हिंदुस्थानी संगीतात जे फेरबदल झाले ते कधीच बाजूला सारता येणार नाहीत. सगळ्यात महत्वाचा बदल झाला तो फार्सी आणि अरेबीक संगीताशी झालेल्या मिलापामुळे. अरेबीक आणि फार्सी संगीतावर अगोदरच ग्रीक संस्कार झाले असल्यामुळे त्यातील काही अंश हिंदुस्थानी संगीतातही उतरला असणार. या सगळ्या संगीतांचे एकत्रीकरण करून कानाला अत्यंत गोड लागेल असे संगीत जन्माला घालण्याची किमया साधली आपल्या येथील संगीतकारांनी.
संगीतसम्राट तानसेन -

रामपूर आणि जयपूरच्या राजघराण्यांनी तानसेन यांच्या वंशजांना दरबारात मानाच्या जागा दिल्या त्यामुळे तेथील संगीत शिक्षणात तानसेनचे संगीत शिकवले जावू लागले. रामपूरचे नवाब तर स्वत:च संगीत शिकायचे आणि ते नंतर संगीततज्ञ म्हणूनही ओळखले जायचे. या नवाबांच्या पदरी थोर गायक होते. उदा. बहादूर हुसेनखॉ, वज़ीरखॉ जे प्रसिद्ध अल्लाउद्दीनखॉसाहेबांचे गुरू होते, मोहम्मद अलीखॉ इ. हे सर्व तानसेनच्या गायकीचे वंशज होते. वज़ीर खान हे स्वत: संगीततज्ञ असून त्यांनी संगीतावर अनेक पुस्तके लिहीली होती. त्यातील एक होते रिसाला मौसिकी. चमनसाहेबांनीही अनेक पुस्तके लिहीली त्यात रिसाला तानसेन हे पुस्तक फार महत्वाचे होते. हे सर्व ग्रंथ अजूनही रामपूरच्या ग्रंथालयात जपून ठेवली आहेत असे मानले जाते. काही जण ती बघितली असे सांगतात तर काही जण ती नष्ट झाली असेही सांगतात. पण मला वाटते ती तेथे असावीत.

त्या काळात राजे महाराजे कलाकारांना आश्रय देत त्यांचे कुटूंब चालवत, त्यांच्या संगीतविद्यालयाला मदत करत त्यामुळे नाही म्हटले तरीही कलाकारांना थोडे त्यांच्या मिंध्यात रहावेच लागे. थोडे हांजी हांजी करावे लागत असे आणि महाराज जर गाणारे असले तर मग विचारूच नका. त्यांना दाद देण्याशिवाय गत्यंतर नसे. पण काही अवलिये हे असले शिष्टाचार झुगारून देत. अशाच एका अवलिया कलाकाराची गोष्ट तुम्हाला सांगतो –
यांचे नाव होते रजब अली खान -

हे स्वत: देवास आणि कोल्हापूर दरबारचे राजगायक होते. फार म्हणजे फार थोर वादक, गायक…. यांना म्हणतच “रज़ब गाते गज़ब”. गाण्याबरोबर ते रुद्रवीणा व जलतरंगही वाजवायचे. येथे जेव्हा मी म्हणतो वाजवायचे/गायचे त्याचा अर्थ एकच घ्यायचा स्वर्गीय वाजवायचे, गायचे…. त्या काळात सर्व महाराजे आपले दरबारी कलाकार दुसर्याज़ दरबारात त्यांची कला सादर करण्यासाठी पाठवायचे. त्यात दोन हेतू असत. एक माझ्याकडे कसले रत्न आहे हे दाखवायचे आणि ज्या संस्थानिकांना खरेच संगीत कळायचे ते त्याचा आनंद घ्यायचे. कोल्हापूरच्या महाराजांचे पत्र घेऊन हे साहेब शेवटी रामपूरला पोहोचले. त्या काळात या संस्थानाचे नाव संगीत क्षेत्रात कसे दुमदुमत असेल त्याची कल्पना आपल्याला तेथील राजगायकांची नावे वाचून आली असेलच. असो. रामपूरच्या नवाबांना भेटायच्या अगोदर त्यांचे राजगायक वज़ीर खान यांना भेटणे क्रमप्राप्त आहे हे समजल्यामुळे रज़ब अली वज़ीर खान यांच्या महालावर गेले. त्यांना तेथे घेऊन जाणारा माणूस आणि हे आत गेले. त्या माणसाने अनेक वेळ कुर्निसात करून तेथेच जमिनीवर आपले बूड आदराने टेकवले. वज़ीर खान एका चांदीच्या खुर्चीवर बसले होते. रज़ब अलींनी तेथीलच एक खुर्ची फर्रकन ओढली आणि त्यांच्या शेजारी बसले. एवढेच नाही तर त्यांनी समोरच्या हुक्क्यातील दोन तीन कशही माराले. या सगळ्या उर्मट वागण्याचा खरे तर वज़ीर खानांना खूपच राग आला होता पण बिचारे गप्प बसले. त्यांनी अत्यंत दरबारी अदबीने त्यांची चौकशी केली. त्यावर उत्तर देताना त्यांनी आपली ओळख करून दिली. : मी गातो, वीणाही वाजवतो आणि माझे गुरू आहेत खॉसाहेब बंदेअली….”
“हो हो मला माहीत आहे. फार थोर गृहस्थ ! पण त्यांचे वाद्य जरा विचित्रच होते नाही?”
“ हो पण त्याचा आवाज तुमच्या त्या डमरूच्या आकाराच्या रामपूरी विणेपेक्षा हजारपटींनी चांगला होता” वज़ीर खासाहेबांचा चेहरा पडला व त्यांनी ती भेट तातडीने आवरती घेतली. या अशा ओळखीनंतर त्यांची नवाबांशी भेट होणे कठीणच होते पण कोल्हापूरच्या महाराजांचे पत्र बरोबर असल्यामुळे त्यांना नाही ही म्हणता येईना. त्यांना भेट नाकारणे म्हणजे कोल्हापूरच्या राजांचा अपमान होणार म्हणून नवाबांनी त्यांची भेट घ्यायची ठरविली. रज़ब अलींना नवाबाच्या संगीत प्रेमाची पूर्ण कल्पना होती. त्यांना हेही माहीत होते की नवाबांना संगिताची उत्तम जाण होती. त्यांना असंख्य ध्रुपदे अवगत होती (असे म्हणतात १०००) तसेच ते स्वत: उत्तम गायक होते आणि त्यांचे लयकारीकडे जास्त लक्ष असायचे. रज़ब अलींच्या मते त्यांनी स्वरांच्या शुद्धतेकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे होते. हे सर्वांनाच माहीत होते पण नवाबांना कोण सांगणार ? त्याच रात्री नवाबांनी रज़ब अलींना आमत्रंण दिले. नवाबांनी काहीतरी पेश केले आणि सर्व उपस्थित लोकांना विचारले “ लयकारी मधे आणि स्वरांमधे माझा हात धरणारा आपल्यापैकी कोणी बघितले किंवा ऐकले आहे का ?
अर्थातच याचे एकच उत्तर होते “ नाही महाराज अजून तरी आम्ही आपल्यासारखे गाणे ऐकले नाही”.
नवाबांनी आपला मोहरा रज़बा अलींकडॆ वळवला आणि त्यांना तोच प्रश्न केला.
“माझेही मत इतरांसारखेच आहे” पण त्या उत्तरात दम नव्हता. नवाबांनी परत परत तोच प्रश्न रज़ब अलींना विचारला. त्यांनीही तेच उत्तर दिले. समाधान न होऊन नवाबांनी सरळ सरळ प्रश्न केला “ रज़ब आम्ही तुला असे विचारतोय की बाकीच्या संस्थानिकांचे जाउदेत. संगीताचे आमच्या इतके ज्ञान त्यांना नाही हे आम्हाला माहीत आहे. इतर गायकांच्या तुलनेत आमचे स्थान कोठे आहे?”

“महाराज आमच्या घरातील लहान मुलेसुद्धा आपल्यापेक्षा चांगली गातात”.

हे ऐकल्यावर नवाबांचा चेहरा काळानिळा पडला आणि ते चिडून म्हणाले “ मी तुला आत्ताच गोळी घातली असती पण माझ्या दुर्दैवाने तुझ्याकडे कोल्हापूरच्या महाराजांचे पत्र आहे. पण आत्ताच्या आत्ता रामपूर सोडून चालता हो.”

५०० रुपये देऊन त्यांची रामपूर संस्थानामधून त्वरित हकालपट्टी करण्यात आली....

असो पण नवाब काय, रज़ब अली काय, आणि वज़ीर खान काय हे सगळे संगीताच्या दरबारातील सम्राट होते….

सेनी घराण्यातील दोन दिग्गजांची येथे नोंद घेतलीच पाहिजे. एक होते बसत खान जे उत्तम गायक व बीनकार होते. त्यांनी काही पुस्तकेही लिहीली उदा. नगमा-ए-आसरी. त्यांच्याच एका शिष्याचेही (निआमतउल्ला खान – एक थोर सरोदवादक) पुस्तक बरेच वाचले गेले त्याचे नाव – नगमा-ए-निआमत. याच बसत खान यांचे शिष्य होते त्यांचे सुपुत्र मोहम्मद अली खान जे ज्यांच्या लेखावर हा लेख आधारित आहे त्यांचे गुरू होते. वज़ीर खान यांचीही शिष्यपरंपरा मोठी होती. अल्लाउद्दीन खान, मुस्ताक हुसेन खान, हाफिज अली खान. पंडीत भातखंडे यांनी ही काही काळ वज़ीर खान यांच्या कडे शिक्षण घेतले होते.

बसत खान आणि वज़ीर खान यांनी तानसेन यांची गायकीपासून अजिबात न ढळता अत्यंत शुद्ध स्वरूपात ती गायकी पूढे शिकवली. त्याच्या या शुद्ध स्वरूपामुळे त्याचा पाया हा शेवटी सांरंगधराचा संगीत रत्नाकर हा ग्रंथ व संगीत हाच होता असे म्हणयला हरकत नाही……

जयंत कुलकर्णी
क्रमश:…..

Posted in लेख | १ प्रतिक्रिया

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत.

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत.

पंड्त बिरेंद्र किशोर रॉय यांच्या लेखावर आधारीत.

हिंदूस्थानी संगीत परंपरा इतकी जूनी आणि थोर आहे की त्याचे मुळ शोधायला गेले तर असे वाटले तर आश्चर्य वाटायला नको की हे संगीत दैवी आहे. हे देवानेच जन्माला घातले आहे. प्राचीन काळी गांधर्व संगीत आणि वैदिक संगीत या दोन्ही पद्धती ऋषीमूनींच्या आश्रमातच जोपासल्या गेल्या असे मानायला भरपूर जागा आहे. अर्थात ज्या राजांच्या आश्रयाला हे ऋषीमूनी होते, ज्यांचा सक्रीय आधार या गुरूकूलांना लाभला होता, त्यांनाही या परंपरेचे श्रेय द्यायलाच लागेल.

पुराणकाळाच्या शेवटी शेवटी देवळात पूजेसाठी संगीताचा वापर चालू झाला आणि संगीताची आणि इतर कलांची एक संस्कृती निर्माण झाली. हीच संस्कृती राजदरबारांतून पूढे जनताजनार्दनात पसरली कारण हे राजे स्वत: या देवळातल्या त्यांच्या कुलदैवतांची पूजा करण्यात धन्यता मानत असत आणि त्यावेळी या संगीताचा पुरेपूर केला जाई. या संगीताला “मार्ग संगीत” असे संबोधले जाऊ लागले कारण हे संगीत साधकाला मार्ग दाखवत असे. नैसर्गिकरित्या या संगीताचा पूढचा प्रवास हा त्या देवळांच्या पूजारी वर्गाच्या हातात होता आणि अर्थातच त्याला राजाश्रय होता. या संगीताचा वापर पूढे पुढे देवालयात होता होता राजदरबारीही मनोरंजनासाठीही होऊ लागला.

या देवळांच्या स्थापत्यामधे त्यामुळे एक वैशिष्ठ्य होते, ते म्हणजे प्रत्येक देवळात कला सादर करण्यासाठी असलेली प्रशस्त जागा. गाणे, प्रार्थना, नृत्य अशा विवीध कला येथेच सादर केल्या जात आणि त्यासाठी लागणार्‍या कलाकरांना राजांचा व सरदारांचा उदार राजाश्रय असायचा. हा राजाश्रय रहायला जागा, वेतन, बिदागी, उदरनिर्वाहासाठी जमीन इ. या स्वरूपात दिला जायचा आणि या कलाकारांच्या पिढ्यानपीढ्य़ा याच्यावर उपजिवीका करत आपल्या कलेची परंपरा अखंड जपत या देवळात आपली कला सादर करण्यात धन्यता मानत असत. उदा. हे खालचे देऊळ बघा –

हे हंपीतील एक देऊळ आहे. डावीकडे दिसतो आहे तो देव्हारा आणि पूढे कला सादर करण्यासाठी सभामंडप. अर्थात हे तसे तुलनेने नवीन आहे. आपण बोलतोय ते यापेक्षाही प्राचीन आहे.

ही जी संगीताची व कलेची परंपरा होती त्याचे मनोरंजनाचे मुल्य ओळखून पठाण बादशहांनी बंद न करता चालू ठेवलीच, पण त्यात फारसी कलाकारांचीही भर घातली. उदा. अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारी नायक गोपाल नावाचा एक गायक ध्रूपद सादर करायचा तर अमीर खूस्रो आपली परमेश्वराची प्रार्थना कव्वाली गायन करून सादर करायचा.

आणि हा महाल –

ही कला या कलेचे जाणकारांमोर सादर केली जायची, त्यात ना केवळ दरबारी अमीर उमराव असायचे तर गावातील जाणकार मंडळीही असायची. उत्तरेची पहिली संगीतसभा ही जौनपूरच्या सुलतान हुसेन साक्री याने आयोजीत केली होती आणि त्यात त्याने अनेक ध्रूपदीये, कव्वाल, संगीततज्ञ यांना आमंत्रण होते. या त्याच्या दरबारातील संगीत तज्ञांनीच या सुलतानाने गायलेल्या दोन रागांना “राग” म्हणून मान्यता दिली होती. त्या रागांची नावे आपल्या परिचयाची आहेत -जौनपूरी तोडी आणि हुसेनी कानडा आणि त्यानीही ती मान्यता या तज्ञांकडून घेतली होती.

ग्वाल्हेरचे राजे “राजा मान तोमार” यांनी तर एका संगीत विद्यालयाची स्थपना केली होती आणि त्यात चार थोर नायक संगीत शिकवायचे काम करत होते. राजा मान हे कायम संगीतसभा भरवत आणि वेगवेगळ्या संगीततज्ञांमधे चर्चा घडवून आणत. या चर्चांमधून अनेक शोध लागत व अनेक नवीन राग रचले जात. यानंतर सम्राट अकबर याने हीच परंपरा चालू ठेवली आणि हिंदूस्तानी संगीताचे सुवर्ण युग अवतरले असे म्हणायला हरकत नाही. अकबराने राजा बाघेला यांच्या दरबारातून मियॉं तानसेन यांना आपल्या दरबारात आमंत्रण देऊन एक गायकांची मैफिल जमवली. त्यात तानसेन सोडून अजून आठ गायक व वादक होते.

अकबराबद्दल अनेक प्रवाद असतील. काही चांगले तसेच काही इतर अनेक मुगल बादशहांबाबत असतात तसे वाईट. पण त्याचे संगीताबद्दलच्या प्रेमाबद्दल कोणी शंका व्यक्त केलेली आढळत नाही. या बाबतीत तरी त्याची सर्वधर्मसमभाव हीच वृत्ती दिसून येते. त्याने सर्व धर्मातील चांगल्या गोष्टींना उत्तेजनच दिले होते. अर्थात काही लोकांचे म्हणणे याच्या उलट आहे. ते म्हणतात त्याने फक्त मुसलमान धर्मियांनाच उत्तेजन दिले. पण संगीताच्या बाबतीत तसे वाटत नाही. अकबराने देवळात चालणार्‍या या संगीत व नृत्य यांचा जो अभ्यास चालत असे, जी परंपरा निर्माण होत होती त्याचा चांगला अभ्यास केला होता आणि याचाच चांगला परिणाम म्हणून त्याच्या दरबारात ध्रूपद गायकीला मानाचे स्थान देण्यात आले. संगीतातील अनमोल खजिने मियॉ तानसेन बादशासमोर दिवान-ए-खास मधे खाली करायचा पण सामान्यजनही या आनंदापासून वंचित राहू नये म्हणून त्यातील काही मोजके पण उत्कृष्ट दिवान-ए-आम मधे सादर केले जायचे. संगीतदरबारांचा हा सिलसीला मोगलांचा शेवटच्या बादशहा “मोहम्मद” पर्यंत चालू राहीला. ही परंपरा मोगल दरबारापुरती सिमीत न राहता इतरही दरबारातून जोपासली गेली, त्याची उदाहरणे पुढे येतीलच. जयपूर, लखनौ, बनारस, बेतीया, बिशनपूर, ग्वाल्हेर आणि रामपूर या संस्थानामधे आधार मिळाल्यामुळे उच्च दर्जाच्या संगीताची जपणवूक झाली हे नाकारण्यात अर्थ नाही. याच संस्थानिकांमुळे हे संगीत जिवंत राहिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनतेचे व या संस्थानिकांचे लक्ष शिक्षणाकडे व इतर बाबींकडे ( जे योग्यच होते) अधिक वळल्यामुळे जरी संगीताकडे जनतेचे दुर्लक्ष झाले नाही तरी या कला जोपासण्यासाठी जी आर्थिक मदत लागते त्याचाच झरा आटल्यामुळे दुर्दैवाने या परंपरेवर जबरदस्त आघात झाला. अनेक बुजूर्ग गायक, कलाकारांचे मृत्यू झाल्यावर त्यांची परंपरा चालवायला कोणीच नव्हते. सरकारलाही या कलांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. (आणि दुर्दैवाने सध्याही नाही). जे काही सध्या शिल्लक आहे त्याचे श्रेय एका महान व्यक्तीला दिले पाहिजे. ती म्हणजे पंडीत भातखंडेजी. या थोर माणसाने संगीताचे जे काही अवशेष इतस्तत: भारतात विखरून पडले होते, ते गोळा करून त्यातून आपल्या महान संगीत परंपरेला एक मूर्त स्वरूप दिले. त्यांनी अनेक संगीत शाळा काढल्या आणि घराण्याच्या परंपरा व त्यांची वैशिष्ठ्ये जपून ठेवली. ज्या गायकांना दोन वेळच्या खायची भ्रांत होती त्यांना मदत केली अथवा मिळवून दिली. त्यांचे हे तळमळीचे कार्य बघून रामपूरचे नवाब, बडोद्याचे गायकवाड आणि काही इतर यांनीही संगीत दरबार परत चालू केले आणि या कलाकारांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर त्यांनी पंडितजींना अखिल भारतीय संगीत सभा भरवायला भरघोस आर्थिक मदतही केली आणि संगीतसभेचा नवीन पायंडा पडला. समाजाला भारतीय संगीताची फेरओळख करून देणे हे या संगीतसभांचे मुळ उद्दिष्ट असायचे. बडोदा, बनारस, लखनौ, इ. शहरातून या सभा व्हायच्या आणि त्यात बाप माणसे आपले गाणे सादर करायची. त्यांची नावे ऐकलीत तर आपण त्या काळात का जन्माला आलो नाही असे आपल्याला निश्चित वाटेल. बघा त्यांची नावे – अलबोंडेखान, नसरुद्दीनखान, राधिका गोस्वामी, गोपेश्वर बॅनर्जी, अल्लादिया खान, अब्दूल करीम खान, बरकतूल्लाखान, जमालुद्दीन व चंदा चौबे, इ….. त्यातच केसरबाई केरकर आणि हिराबाई ऐन उमेदीत होत्या..

पंडीत भातखंडेजीनंतर या संगीतसभांना श्रीमंत उद्योगपतींचा व धनिकांचा आश्रय लाभला व सुदैवाने ही परंपरा कशीबशी का होईना चालू राहिली हे आपले नशीब.
नंतर क्रांती झाली ती आकाशवाणीमुळे. आकाशवाणीमुळे जनतेला थोर लोकांचे गाणे फुकट ऐकायला मिळू लागले तसेच कलाकारांचीही काही प्रमाणात आर्थिक विवंचना मिटली. आकाशवाणीवरून जनतेचे संगीताचे शिक्षणही होण्यास मदत झाली ते वेगळेच. दिल्ली आकाशवाणीकडे अशा कार्यक्रमाचा मोठा म्हणजे खूपच मोठा खजिना आहे. आणि त्याची किंमत किती हे जाणकारच सांगू शकतील. या ठेव्याचा उपयोग पुढच्या पिढ्यांना निश्चितच होणार याची मला खात्री आहे फक्त तो बाहेर यायला पाहिजे. सरकारही आता नवीन नवी कलाकारांना खुपच प्रोत्साहन देत आहे, पण ते पुरेसे नाही. शास्त्रीय संगीताची एक वेगळी वाहीनी वा रेडिओ केंद्र त्वरीत चालू करून लोकांना चांगले संगीत ऐकवायला पाहिजे आणि या कामाला प्राधान्य देवून ते पूरे केले पाहिजे. या आपल्या कलेचा वारसा पुढे चालावा असे वाटत असल्यास चांगले गायक आणि गाणे समजण्यासाठी चांगले कानसेन तयार करणे ही आपली जबाबदारी आहे…

मधे मी एका पाश्चात्यसंगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणी डेनमार्कचे एक पथक आले होते. पिआनो, चेलो, आणि व्हायोलीन असा कार्यक्रम होता. त्याच्या प्राथमिक भाषणात त्यांनी डेनमार्कच्या राणीचे आभार मानले. याचे कारण ऐकल्यावर मी खरोखरच आश्चर्यचकीत झालो. राणी दर वर्षी संगीताच्या स्पर्धा भरवते. प्रत्येक वाद्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा. मग प्रत्येक वाद्यस्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना एकत्र वाजवायची संधी देऊन जगभर त्यांचे कार्यक्रम भरवण्यासाठी पूर्ण आर्थिक मदत देण्यात येते. पुढचे ऐकून मी चाटच झालो. राणीने एक मोठी गाडी तयार केली आहे ज्यात साधारणत: ३० मुले बसू शकतात आणि उच्च दर्जाच्या साऊंड सिस्टीमवर ते शास्त्रीय संगीत ऐकू शकतात. त्याच गाडीत एक छोटेसे व्यासपीठःइ आहे ज्यावर एखाद्या वाद्याचा कार्यक्रमही होऊ शकते. ही गाडी रोज एखाद्या शाळेत जाते आणि त्यातील सर्व मुलांना हे संगीत ऐकवते आणि ते कसे ऐकावे हेही शिकवते…कारण ते त्यांचे उद्याचे श्रोते आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचे संगीत व परंपरा जिवंत राहणार आहेत...

चांगले काय हे कळण्याचेही प्रशिक्षण द्यावे लागते या मताचा मी आहे……..
जयंत कुलकर्णी.
क्रमश:………….
पुढच्या भागात संगीताचा इतिहास……….

Posted in प्रवर्ग नसलेले | १ प्रतिक्रिया

मला आवडलेली काही वाक्ये……………..

…. दोन वर्षे झाली मी वेळ मिळेल तसे लिहितोय लिहितोय….. नंतर हार्ड डिस्क चाळता चाळता अजून एक जूने पान सापडले…तारीख १८-८-२००८…. त्या पानावर मी मला आवडलेल्या काही वाक्यांचा अनूवाद करून ठेवला होता…..

प्रेम.
रस्त्यावर तो फिरत होता,
त्याचे कपडे फाटके होते.
कोट उसवलेला होता आणि
त्याला ठिगळे होती.
त्याच्या उसवलेल्या बुटातून
पाणी ठिबकत होते,
आणि ह्रदयातून तारे ओसंडत होते.
तो कोणाच्यातरी प्रेमात पडला होता.
– व्हिक्टर ह्युगो.

अडाणी.
तुम्ही जर चांगली पुस्तके वाचत नसाल,
तर ज्याला वाचता येत नाही,
त्याच्यात आणि तुमच्यात मला
विशेष फरक करता येईल असे वाटत नाही.
– मार्क ट्वेन.

दिशाहीन
कुठे जायचे हे ठरले नसेल तर
प्रत्येक रस्ता हा आपलाच आहे
असे वाटायला लागते.
– लुईस कॅरॉल

श्रीमंत
निसर्ग आणि स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर
तुम्ही दारिद्र्यात जगणार नाही.
जगाच्या मतांप्रमाणे चालत राहिलात तर मात्र
निश्चितच श्रीमंत होनार नाही.
– सेनेका

दिनचर्या.
सकाळी विचार कर
दुपारी त्यावर काम कर
संध्याकाळी चांगल चुंगलं जेव
रात्री छान झोप.
– विल्यम ब्लेक

खलाशी
दिवस लहान होते आणि रात्री मोठ्या होत्या.
सुर्यप्रकाश जवळ्जवळ नव्हताच.
बोटीवरच्या केबीन्समधे
वातावरण उदासवाणे होते.
ते अजूनही तुमच्या मनाचा ताबा घेते.
– बील कुपर.

प्रेम
जास्त अंदाज, तर्क,
कमी प्रेम !
– सेनेका.

घर
ज्यात तुम्ही रहाता
त्याला घर म्हणता येतेच असे नाही.
जेथे तुम्हाला समजून घेतले जाते
त्याला खरे घर म्हणता येईल.
– मॉर्गनस्टर्न.

नष्टचर्य.
मुले आणि संशोधन यांच्यात विलक्षण साम्य आहे.
दोन्हीत तुम्ही गुंतवणूक करता. पुढे काय होणार याची तुम्हाला कल्पना नसते,
आणि ते तुम्ही सांगूही शकत नाही.
काही कारणांमुळे तुम्ही दोन्हीही बंद करू शकता.
पण त्याचा परिणाम एकच !
तुमचा धंदा बंद होऊ शकतो
आणि
मानवजात नष्ट होऊ शकते.
– माहीत नाही.

मित्र.
माणसाच्या आयुष्याचे चांगले आणि वाईत असे दोन भाग केले तर -
चांगल्या भागाचा ९० टक्के भाग हा मित्र आणि मैत्रीने व्यापलेला असतो.
– लिंकन अब्राहम.

यश
जर तुम्हाला एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल
किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचे स्वप्न बघत असाल तर त्या दिशेने लगेच पाऊल टाका.
धैर्यामधे हुशारी, शक्ती आणि जादूचा सुरेख संगम असतो.
– गोएथ.

जयंत कुलकर्णी.

Posted in लेख | १ प्रतिक्रिया

पराभवाचे श्राद्ध भाग-६

मागील प्रकरणात लिहिलेल्या प्रकरणांमधे श्री. कृष्णमेनन यांचीच फक्त चूक होती का ? कारण तो माणूस उद्धट असेल, त्याची वागण्याची तर्हा विचित्र असेल पण तो दूधखूळा नव्हता. उलट ते संरक्षणमंत्री झाल्यावर सेनादलात उत्साहाचे वातावरण पसरले होते, हेही मी लिहीलेच होते. कर्नल आठवले ज्यांनी १९६२ सालच्या युद्धाचा अधिकृत सरकारी इतिहास लिहीला आहे ते काय म्हणतात ते बघू -
But the biggest ‘mystery’ of 1962 is the non-use of offensive air power by India. The whole conflict was run as a personal show by Kaul and there was very little co-ordination with the air force. At that time the Chinese had barely two airfields in Tibet and their fighter aircraft were decidedly inferior to India’s British-made Hunters.
The Indian Air Force was guaranteed virtual air superiority on the battlefield. With air power on its side, India could have overcome the tactical disadvantage of lack of artillery in Ladakh and could have intercepted the foot and mule columns of the Chinese in Tawang area (like it did during the Kargil conflict in 1999). But such was the irrational fear of Chinese retaliation against Indian cities that India did not use its air power.
This fear of danger to cities was a result of panic in Calcutta… The only long-range aircraft the Chinese had at that time was the Ilyushin 24, operating at extreme ranges. The Indian Air Force with its network of airfields in the East (thanks to World War II) was well capable of dealing with it.

Right till the end, Krishna Menon was in favour of use of air power, but was overruled by a leadership that had lost its nerve. Use of offensive air power could have tilted the balance on the ground and boosted the morale of our troops. The morale factor is of great importance as essentially even the Sela disaster was due to loss of morale.

स्व. यशवंतरावांचे आणि त्यांच्या निर्णयाचे महत्व आपणास आता कळले असावे.

१९६२ साली झालेल्या आपल्या सेनेच्या काही आघाडींवर झालेल्या पानिपतानंतर दोन चकमकींनी आपल्या सैन्याचा आत्मविश्वास अतोनात वाढवला आणि चिनी राज्यकर्त्यांना व सैनिकांना ज्या सैनिकांनी दोन महायुद्धात भाग घेतला होता त्यांची खरी ओळख झाली. या चकमकी जवळजवळ तुल्यबळ सैन्यामधे होत्या असे म्हणायला हरकत नाही. त्यातली पहिली चकमक किंवा लढाई होती “नथू” खिंडीत (नथू-ला) आणि दुसरी झाली “चो” खिंडीत (चो-ला). समोरा समोर झालेल्या या चकमकींमधे सैनिकांच्या शौर्याची खरी कसोटी लागते. अर्थात आपले सैनिक यात कधीच मागे पडले नाहीत. भाग घेतलेल्या माऊंटन डिव्हिजनचे प्रमूख होते मे. जनरल सगत सिंग, कोअर कंमांडर होते ले. जनरल अरोरा आणि पुर्व कमानचे प्रमूख होते ज. सॅम मानेकशॉ.

उंचीवर लढाईचे तंत्र वेगळे असल्यामुळे आता सर्व सैनिकांना व आधिकार्यां ना त्या वातावरणाची सवय पद्धतशीरपणे करून दिली जात होती. त्यांचा दमसासही उत्कृष्ट राहील याची काळजी घेतली गेली. त्यासाठी अनेक दिवसांचे प्रशिक्षण आखलेले होते आणि प्रत्येकाला त्यातून जाणे भाग होते. नथू-ला खिंडीच्या जवळ साधारणत: एक मैलांवर अजून एक खिंड आहे. या खिंडीच्या उंचीमुळे नथूलाचा सगळा परिसर येथून दृष्टीक्षेपात येतो. महत्वाचे म्हणजे चिनी सैन्याच्या हालचाली व पुर्वेकडे असलेल्या एका टेकाडावरचे चिनी ठाणे हे या साबू खिंडीतून स्पष्ट दिसते. या खिंडीत आपल्या सैन्याने दोन चौक्या उभ्या केल्या होत्या आणि त्यांच्याजवळ चांगली बिनतारी संदेश यंत्रणाही देण्यात आली होती. याहून महत्वाचे म्हणजे मागे असलेल्या तोफखान्याशी त्यांचा संपर्क टेलिफोनने जोडलेला होता. हा फार महत्वाचा असतो. थोडक्यात हे ठाणे त्या तोफखान्याचे “OP” म्हणून उत्कृष्ट काम करु शकत होते.

नथू-ला ही एक १४२०० फुटावर असलेली महत्वाची खिंड आहे आणि या रस्त्यावरून चीनच्या हद्दीतील जनतेशी स्थानिक जनता व्यापार करते. हाच तो प्रसिद्ध प्राचीन गंगटोक-याटूंग-ल्हासा व्यापाराचा रस्ता. १८९० साली झालेल्या चीनी-इंग्लंड करारानुसार खरे तर या दोन (सिक्कीम-चीन) देशांची सीमारेषा नीट आखून दोन्हीकडून मान्य करण्यात आली होती पण चीनला सिक्कीमची सीमा रेषा खूपत होती याचे अजून एक कारण होते ते म्हणजे सिक्कीम मधे करारानुसार असलेले भारतीय सैन्य. १९६५ साली झालेल्या पाकिस्तानच्या युद्धादरम्यान चीनने भारताला नथू-ला आणि जेलेप-ला या दोन खिंडी खाली करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आणि न समजलेल्या कारणांसाठी जेलेप-ला ही खिंड खाली करण्यात आली.( या संधर्भातील कागद्पत्रे अजून उघड करण्यात आली नाहीत ती तातडीने करायला पाहिजे आहेत. ही खिंड अजूनही चिन्यांच्या ताब्यात आहे.) ज. सगत सिंग यांनी नथूला खाली करायला मात्र ठाम नकार दिला. भारत-चीन या दोन देशांच्या एकूण ४००० कि.मी. सीमारेषेवर याच ठिकाणी दोन्ही सैन्ये सगळ्यात जवळ उभी ठाकली आहेत. खिंडीचा पूर्व भाग हा चिनच्या ताब्यात आहे तर अलिकडचा आपल्या.

लाल रेषा सीमारेषा दर्शवते.

ही चकमक उडाली तेव्हा २-ग्रेनेडियर्स ही रेजिमेंट तेथे पहार्या वर होती. या बटालियनचे प्रमूख होते ले. कर्नल राय सिंग. दररोज चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक या रस्त्यावर आपापल्या हद्दीपर्यंत गस्त घालतात, त्यामुळे रस्त्याच्यामधे जेथे सीमारेषा आहे तेथे ते एकामेकांपासून काहीच फूटांवर असतात. या गस्तीदरम्यान वादावादी, धुसमुसळेपणा हा नित्याचाच असतो. तसे झाल्यावर आधिकारी ती भांडणे समजूतीने मिटवतात व परत दैनंदिन कार्यक्रम चालू होतो. चिनी बाजूला इंग्रजी येणारा त्यांचा राजकीय अधिकारी असतो आणि तो ओळखता येतो तो त्याच्या टोपीवरच्या एका लाल तार्या ने. अशाच एका वादावादीचे पर्यावसान ६ सप्टेंबरला धक्काबूक्कीत झालेच. या प्रकरणात तो जो लाल तारेवाला राजकीय आधिकारी होता तो खाली पडला आणि त्याचा चष्मा तुटला. या प्रसंगामुळे निर्माण झालेला तणाव लक्षात घेता भारतीय आधिकार्यां नी त्या रस्त्यावर सीमारेषेवर तारेचे कूंपण घालायचे ठरवले.

हे काम देण्यात आली ७०-इंजिनियर्सना देण्यात आले व त्यांच्या संरक्षणासाठी १८-राजपूतची एक कंपनी. ११ सप्टेंबरला पहाटे हे काम चालू करायचे ठरले. ११ सप्टेंबरची पहाट स्वच्छ उगवली, नाहीतर इतरवेळी धूकेच धूकेच असते. इंजिनियर्सने खांब रोवायला सुरवात केली त्याबरोबर एक चीनी राजकीय आधिकारी सैनिकांची तुकडी घेऊन तेथे आला. तेथेच आपल्या हद्दीत ले. कर्नल राय सिंग आपल्या कमांडोच्या तुकडीबरोबर हजर होते. अपेक्षेप्रमाणे त्या चिनी आधिकार्यााने कर्नल राय सिंग यांना ते काम ताबडतोब थांबवायचा इशारा दिला. ब्रिगेड कमांडर आणि सेनादलाचा आदेश स्पष्ट होता. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत असल्या धमक्यांना भीक घालायची नव्हती. वादावादीनंतर धक्काबूकी झाली व परत त्या बडबडणार्या उद्धट आधिकार्यालला मारहाण करण्यात आली. हा प्रसंग घडल्यावर चिनी सैनिक आपल्या बंकरमधे परत गेले आणि भारतीय सैनिकांनी कूंपण उभारायचे काम परत चालू केले.

हे झाल्यानंतर थोड्याच मिनिटात चीनी बाजूला एक शिट्टी ऐकू आली आणि त्या पाठोपाठ पुर्वेकडून मशीनगनचा भडिमार चालू झाला. त्या रस्त्यात कुठेही आडोसा नसल्यामुळे बरेच सैनिक ठार झाले आणि स्वत: कर्नल राय सिंग पोटात गोळ्या घुसल्यामुळे जखमी झाले. त्या अवस्थेतही त्यांनी जवानांना काय करायचे ते सांगितले आणि ते त्यांना प्रोत्साहन देत होते. उरलेल्या सैनिकांना घेऊन कॅ. डागर आणि मे. हरभजन सिंग यांनी त्या मशिनगनवर चाल केली पण ते दोघेही त्या मशीनगनच्या मार्यासत जागेवरच मृत्यूमूखी पडले. त्यांनाही मरणोत्तर वीर चक्र आणि महावीरचक्र प्रदान करण्यात आले. २-ग्रेनेडियर्सच्या जवानांनी त्या मशीनगनच्या दिशेने त्यांच्या बंदूकांनी गोळ्यांच्या फरी झाडल्या पण अर्थातच त्याचा उपयोग होत नव्हता. पहिल्या १० मिनिटात ७० सैनिक तेथे मरून पडले आणि किती जखमी झाले त्याची गणतीच नाही. अर्ध्या तासातच चीनी तोफखान्यानेही हल्ला चढवला. आता मात्र सेबू-ला वरच्या आधिकार्यां नी आपल्या तोफा वापरायची परवानगी मागितली. ती थोडी उशीरा आली पण आली. या ठिकाणाहून सर्व चीनी बंकर्स स्पष्ट दिसत असल्यामुळे, तोफखान्याच्या अचूक मार्या त ते सर्व नष्ट करण्यात आले. पहिल्या काही तासातच ४०० चिनी सैनिक ( त्यांच्या माहितीप्रमाणे-कदाचित जास्तच असतील. अनुभवाने संख्या ५०० च्या वर असावी) ठार झाले. हे तोफखान्यांचे युद्ध चार दिवस चालले. १४ सप्टेंबरला चिन्यांनी हवाईहल्ल्याची धमकी दिली पण त्याला भीक न घालता होणारा अचूक भडीमार चालूच राहिला. त्याव दिवशी चिन्यांनी प्रथमच भारतीय सेनेकडे युद्धबंदीची मागणी केली. चिन्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या मेलेल्या सैनिकांचे मृतदेह त्यांच्या हद्दीत नेऊन टाकले होते आणि युद्धबंदीची जी बैठक झाली त्यात नेहमीप्रमाणे त्या सैनिकांनी सीमारेषेचा भंग केला असा कांगावा केला. १५ सप्टेंबरला मृतदेहांची अदलाबदल करण्यात आली, त्यावेळेस स्वत: ज. मानेकशॉ, ज. अरोरा आणि जनरल सगत सिंग हजर होते.

चो-ला ची चकमक.
सिक्कीममधे १९६५ सालातील सप्टेंबर महिन्यात ७/११ ग्रेनेडियर्स (गुरखा रायफल्स) च्या बटालियनला हुश्शार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. कारण होते चिनी सैन्याने आपल्या काही भूभागावर हक्क सांगून तेथील चौक्या हटवायचा निर्वाणीचा इशारा दिला होता. ७/११ ग्रे. आणि १० जम्मू-काश्मिर रायफल्सच्या एका बटालियनने ४७२० मीटर उंचीवर मोर्चा संभाळला होता. दोन वर्षे असेच चालले होते. किरकोळ कुरबूरींशिवाय काही घडले नाही. अचानक ११ सप्टेंबर १९६७ रोजी नथूला खिंडीचे प्रकरण झाले, त्याबद्दलही आपण वर वाचले आहेच. गंगटोकच्या रस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी ७/११ ने रातोरात योग्य जागा बघून आपल्या चौक्या उभ्या केल्या. नथूलाच्या चकमकी थांबल्या आणि ७/११ च्या वाढदिवसानिमीत्त त्यांची जागा १० जे-के रायफल्सला देण्याचे आदेश आले. २८ तारखेला आपली संदेशवहनाची सामूग्री, तोफा इ. घेऊन १०-जेके ने आपली जागा सोडली व आघाडीचा रस्ता पकडला. संदेशवहनाची यंत्रणा, चो खिंडीच्या पश्चिम-दक्षिण दिशेला दोन झोपड्या होत्या, त्या ठिकाणी उभी करायची योजना होती. चो खिंडीत एक तोफ, तर दोन पलटणींनी १५१८१नंची चौकी गाठायची आणि तेथील ११-ग्रेच्या सैनिकांना परत पाठवायचे असे ठरले होते. डी. कंपनीच्या दोन पलटणींनी १५४५० नं.ची चौकी जी पश्चिमेला होती तेथे संरक्षणाची जबाबदारी स्विकारली होती. उरलेल्या दोन पलटणींपैकी एक रायगाप येथे, तर एक ताम्झेच्या पिछाडीला अशी कामाची वाटणी झाली. या पलटणीबरोबर एक उखळी तोफांची तुकडी ठेवण्यात आली.

एक दिवस अगोदर १० जेकेच्या काही शिख जवानांची चिनी सैनिकांशी एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावरून बाचाबाची झाली होती. किती मोठा तुकडा असेल हा ? फक्त अंदाजे ५ मीटर लांबीचा हा तुकडा होता. सिमेवर वातावरण हे असे असते आणि ते तसेच ठेवावे लागते. अरे ला कारे विचारल्याशिवाय शत्रूही आपला आब राखत नाही. ते जगच वेगळे असते. आपल्याला येथे वाचून त्याची खरीखुरी कल्पना यायची नाही. तर या तुकड्यावर एक खडक होता आणि त्यावरून त्यांची जुंपली होती. हा तुकडा ना त्यांच्या हद्दीत होता न आपल्या. या तुकड्याच्या मध्यभागी एक पांढरी रेषा अस्पष्टशी दिसत होती. या खडकाच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशाचे तीन तीन सैनिक पहारा देत उभे रहात असत. या सैनिकांमधे साधारणत: दोन एक मिटर अंतर राखले जाते. कारण नुसता एकामेकांचा धक्का जरी चुकून लागला तरी १०-१५ जणांचे प्राण सहज जाऊ शकतात. विस्तवाशीच खेळ ! कारण बंदूकीच्या चापावर कायमच बोट आवळलेले असते. या भांडणात जी वादावादी झाली त्यात एका चिनी सैनिकाला मारण्यात आले आणि त्याच्या कोटाचे बटण तुटले. हे झाल्यावर ते चिनी सैनिक परत गेले आणि दैनंदिन कार्यक्रम परत चालू झाला. हे झाले पण याची खबरबात मे. जोशी जे या कंपनीचे प्रमूख होते त्यांना फार उशीरा कळवण्यात आली. ३० सप्टेंबरला त्या दोन झोपड्यांच्या तळावर पोहोचल्यावर मे. जोशींनी त्यांच्या दोन कंपन्यांनी आघाडीवर चौक्या प्रस्थापित केल्या आणि ते १५४५० कडे निघाले. ले. राठोड यांना त्यांनी तशी कल्पना दिली की ते साधारणत: दुसर्याण दिवशी म्हणजे १ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊला तेथे पोहोचतील. मे. जोशी मधे वाटेत लागणार्या राईगापला पोहोचले. या येथून १५५४० ची चौकी दिसत होती. वरून त्या दिशेला पहात असताना त्यांना दिसले की चिनी सैनिकांच्य़ा एका तुकडीने त्या चौकीला घेरण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत आणि एक तुकडी डी कंपनी जेथे तैनात होती त्या दिशेला जाताना दिसली. मे. जोशींनी ले. राठोडयांना त्वरित त्यांनी जे बघितले त्याची माहिती दिली. ले. राठोड यांनी लगेचच त्या खडकावर चिनी अधिकारी हक्क सांगत आहेत व त्यांच्या बरोबर त्यांचा एक राजकीय अधिकारीही आला आहे ही माहीती दिली व काय झाले ते सांगितले.

इकडे नायब सुभेदार ग्यान बहादूर लिंबू (गुरखा) हे चिनी सैनिकांशी वाद घालत होते आणि त्या वादावादीच्या दरम्यान त्या खडकावर त्यांनी आपला उजवा पाय ठेवला. त्याबरोबर एका चिनी सैनिकाने त्यांच्या पायाला लाथ मारली आणि तो त्या खडकावरून बाजूला सारला – आमच्या हद्दीत पाय ठेवायचा नाही इ. इ….सुभेदारांनी आपला तोच पाय परत त्याच तेथे ठेवला आणि त्या सैनिकांना आव्हान दिले. वातावरण फारच तापत चालले होते. हे होत असताना उरलेल्या चिनी सैनिकांनी पटापट त्यांच्या जागा घेतल्या आणि आपल्या बंदूका सरसावल्या. बहुदा हे प्रकरण चिघळवायचे हे त्यांचे अगोदरच ठरलेले असावे. इकडे त्या चिनी सैनिकाने आपली संगीन सुभेदारांवर चालवली. त्याचा घाव बसला त्यांच्या हातावर. पुढे काय झाले ते सिनेमातल्या सारखे होते. ज्या सैनिकांने हा हल्ला केला त्याचे दोन्ही हात कुकरीने धडावेगळे झालेले त्यालाच कळले नाही. हे बघताच जागा घेतलेल्या चिनी सैनिकांनी बंदूका चालवायला सुरवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार चालू झाला आणि लान्स नाईक कृष्णा बहादूर यांनी आपले सैनिक घेऊन हल्ल्यासाठी एकत्रीत होणार्याे चिन्यांवर हल्ला चढवला. त्यांच्या मागेच “आयो गुरखाली” ही युद्ध गर्जना देत देवी प्रसाद हा जवान त्वेषाने चिन्यांवर तुटून पडला. पहिल्याच झटक्यात त्याने आपल्या कुकरीने पाच चिन्यांची डोकी उडवली.
सुभेदार लिंबू यांना छातीत लागलेल्या एका गोळीने वीरगती प्राप्त झाली. त्यांना, या दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि पराक्रमाबद्दल मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले. लान्स नाईक कृष्ण बहादूर यांचे शव नंतर चिनी सैनिकांनी लष्करी इतमामाने परत केले. ते परत करायला जो चिनी अधिकारी आला होता त्याला इंग्रजी येत होते आणि त्याने कबूली दिली की “ते वाघांसारखे लढले”.

कूकरीचे प्रात्याक्षिक – प्रशिक्षणाच्या काळात.

या घटनेचे महत्व १९६२ सालच्या युद्धात झालेल्या मानहानी नंतर प्रचंड होते. चिनी सैनिकांच्या मनातल्या भारतीय सैनिकांबद्दलच्या कल्पनांना जोरदार धक्का बसला.

इकडे नं १५४० वर ले. राठोड यांना गोळी लागून ते जखमी झाले. जखमी अवस्थेतही त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही जेव्हा त्यांना पोटात व छातीत गोळ्या लागल्या तेव्हा या वीराने त्या युद्धभूमीवर आपला प्राण सोडला. आपल्या पलटणीचे नेतृत्व ते मरेतोपर्यंत करत राहिले. हे बघताच मे. जोशींनी आपल्या तोफखान्याच्या अचूक मार्यायने चिनी सैनिकांचे आक्रमण बंद पाडले. आपल्या तोफखान्याला मार्गदर्शन करताना त्यांच्या नजरेस एक चिनी सैनिक कड्याच्या मागून येताना दिसला. एका सैनिकाची रायफल घेऊन मे. जोशींनी त्याला यमसदनास पाठवले.

१५४५० वर आता शांतता पसरली होती तरी ताम्झे आणि रायगाप वर आता रॉकेट आणि आर.सी एल तोफांचा मारा चालू झाला. यात ताम्झेवर जास्त कारण त्या ठाण्यामुळे चिन्यांची पिछाडी धोक्यात येऊ शकली असती. यातच जेके रायफल्सच्या एका बंकरवर एक गोळा पडल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. हेही ठाणे गुरख्यांनी अजून ताब्यात घ्यायचे होते. चिनी पद्धतीने होणार्याु (लाटे प्रमाणे) हल्ल्यांना परतवून लावण्यात येत होते.

शेवटी मेजर जोशी यांच्या तोफांनी चीनी तोफा बंद पाडल्या. चो खिंडीत ज्या आपल्या सैन्याच्य आर. सी. एल तोफा होत्या त्यांनी १५४५० जवळच्या चिनी सैनिकांच्या मशीनगनच्या तुकड्यांवर अचूक मारा करून पहिल्याच मार्याोत त्या बंद पाडल्या. या तोफखान्याच्या प्रमूखाने वरून अखंड बॉंबवर्षाव चालू असताना तोफगोळ्याचा अखंड मारा चालू ठेवला तो दारूगोळा संपल्यावर थांबला. त्यासाठी त्यांनाही वीरचक्र प्रदान करण्यात आले. दुर्दैवाने मला त्यांचे नाव सापडले नाही. चिनी तोफांचा मारा बघून सैनिकांना १५४५० वरून माघार घ्यायचा आदेश देण्यात आला. त्याच वेळी चीनी सैनिकांनी आकाशात हिरव्या रंगाचे प्लेअर उडवले जी युद्धबंदीची निशाणी होती. थोड्याच वेळात त्या युद्धभूमीला दाट धूक्याने वेढले आणि सगळीकडे शांतता पसरली. या धुक्याच्या आवरणात मे. जोशींनी त्या झोपड्यांच्या येथे आपले खंदक खणले. इकडे मे. नायर जे जेके रायफल्सचे होते त्यांनी ब्रिगेड कमांडला या सर्व घटनांची सविस्तर माहिती दिली होती. त्यावेळी त्या ब्रिगेडचे प्रमूख होते ब्रिगेडियर कुंदनसिंग. त्यांनी ताबडतोब युद्धभूमीवर जाऊन ७/११ च्या उरलेल्या गुरखा रेजिमेंटच्या कंपन्यांना ताम्झेकडे कूच करण्याची आज्ञा दिली. होणार्या/ हल्ल्यासाठी तोफाही तयार करण्यात आल्या. हालचाल दिसतात चिनी सैनिकांनी आकाशात प्रकाश फेकणारे फ्लेअर्स उडवले तेव्हा त्यांना उमगले की त्यांच्या तिन्ही बाजूला गुरखा सैनिक आहेत आणि पुढून हल्ला होणार आहे. त्यांनी एकही गोळी न उडवता सन्मानाने माघार घेतली.

त्याच संध्याकाळी ज्या खडकावरून हे सगळे घडले त्या खडकावर मे. जोशींनी परत आपला बूट ठेवला आणि त्यांना कोणीही हटकले नाही………….

वाचकहो, त्या निर्जन भागात त्या पाच मिटर जमिनीच्या तुकड्यावर असलेल्या त्या खडकाची किंमत काय, हे तहात जे हरतात, किंवा जे आपला भुभाग शत्रूला सहज देऊन टाकतात, त्यांना कशी कळावी ……………?

या आणि नथू खिंडीत झालेल्या चकमकींमुळे चिनी सैन्याचा जो दबदबा उगिचच आपल्या सामान्य सैनिकांमधे पसरला होता तो कायमचा नष्ट झाला………

जयंत कुलकर्णी.
यानंतर अमेरिका ज्यांनी आपल्याला विमाने भरून मदत पाठविली या युद्धाबद्दल काय म्हणते ते सांगायचा प्रयत्न करणार आहे.

Posted in लेख, इतिहास | १ प्रतिक्रिया